
Tej Police Times
नागपूर, दि.30 : विद्यार्थी हितासाठी परीक्षा, निकाल व प्रवेश प्रक्रियेबाबत कालबद्ध नियोजन करून निश्चित वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
मंत्री श्री. पाटील यांनी आज सुयोग पत्रकार निवासस्थान येथे भेट देऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. शिबिर प्रमुख विवेक भावसार उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, विद्यार्थी हितासाठी परीक्षा, निकाल व प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने दरवर्षी मार्च अखेरीस परीक्षा, जून अखेरीस निकाल व जुलै अखेरीस प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, असे नियोजन करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थी केंद्रित आहे. त्याबाबत राज्य शासनाने अनेक टप्पे पूर्ण केले आहेत. याविषयी लवकरच सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली जाणार आहे. त्यात धोरणाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय होईल. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ऑनलाईन प्रक्रिया अधिकाधिक अद्ययावत व सुलभ केली जात आहे.
अधिवेशनातील निर्णय, विधेयके, राज्य शासनाचे निर्णय, राजकारण, समाजकारण आदी विविध विषयांवर मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. श्री.भावसार यांनी स्वागत केले.
Next Post
Recover your password.
A password will be e-mailed to you.