तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

राजपथावरील महाराष्ट्राच्या चित्ररथात अवतरणार ‘साडेतीन शक्तिपीठे’; होणार स्त्रीशक्तीचा जागर

0 75

म. टा. खास प्रतिनिधी. मुंबईः प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा राज्यातील ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ याचे दर्शन होणार आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिली. या चित्ररथाचे काम नवी दिल्ली येथे युद्धपातळीवर सुरू आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट संवाद साधला. यानंतर आपल्या प्रयत्नांना यश आले, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवींच्या भव्य, तितक्याच सुंदर प्रतिमांचे आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन यावेळी सर्व देशवासीयांना होणार आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असते.

पथसंचलनात सहभागी होणारी राज्ये आणि मंत्रालये आपापल्या परीने उत्तमोत्तम संकल्पना निवडतात आणि कलाकार त्या संकल्पनांना मूर्त रूप देऊन मंत्रमुग्ध करतात. यावर्षीची संकल्पना, रेखाचित्रे व त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवा मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे. त्यांच्यासोबत ‘शुभ एड’चे संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे हे भव्य प्रतिकृतीचे काम सांभाळत आहेत. ३० जणांचा समावेश असलेल्या टीमला घेऊन राहुल धनसरे महाराष्ट्राचा चित्ररथ पूर्ण करण्याचे काम करीत आहेत. २६ जानेवारीपर्यंत तो पूर्ण होईल, अशी माहिती मुनगंटीवर यांनी दिली. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे व सहकारी यांच्या सहकार्याने हा चित्ररथ पूर्णत्वास येत आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.