तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

उद्धव ठाकरे शेठजींप्रमाणे काम करत आले, आशिष शेलार यांची टीका

0 44

मुंबई : ‘मुंबई महापालिकेवर गेली अनेक वर्षे सत्ता असलेल्या उद्धव ठाकरे यांनी एवढी वर्षे एखाद्या शेठजींप्रमाणे काम करीत मुंबई महापालिकेच्या ठेवी कंत्राटदारांना वाटल्या. कंत्राटदारांचे पैसे देण्यासाठीच शेठजी उद्धव ठाकरे लक्ष देत आहेत. या शेठजी आणि कंत्राटदारांपासून मुंबईची मुक्तता करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे’, अशी ग्वाही मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मंगळवारी दिली.

तत्कालीन महापालिका आयुक्त तसेच लोकप्रतिनिधींनी मेहनत घेतल्याने मुंबई महापालिकेच्या मुदतठेवी वाढल्या आहेत. भाजप मात्र मुंबईला भिकेला लावणार असल्याचे वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले होते. ‘एक अपयशी नेता म्हणजे उद्धव ठाकरे. स्वतःच्या कुटुंबातील बंधूंनाही एकत्र ठेवू शकले नाहीत. पक्षही एकत्र ठेवला नाही. गणेश नाईक ते नारायण राणे सगळेच त्यांच्यावर आरोप करून बाहेर पडले. सरकारही वाचवू शकले नाहीत. अशा अपयशी माणसाच्या बोलण्याला महत्त्व द्यायचे नाही, असे मुंबईकरांनी ठरवले आहे’, असा दावा शेलार यांनी केला.

‘गेल्या २५ वर्षांत केवळ रस्त्यावर या दरोडेखोरांनी २२ हजार कोटी रुपये खर्च केले. महापालिकेच्या अर्थसंकल्पावर एवढा मोठा दरोडा टाकला. शेठजीसारखे काम केले. भाजपला मुंबईकरांनी संधी दिली तर आम्ही सेवक म्हणून काम करू’, असे आश्वासन शेलार यांनी दिले. दरम्यान, मुंबईला कोंबडीची उपमा देणे उचित नाही, अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी दिली. मुंबईच्या विकासाबद्दल आणि कोणत्याही प्रकल्पाबद्दल उद्धव ठाकरे यांनी बोलू नये, गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई ही शिवसेनेच्या हातात आहे. त्यामुळे यावर बोलण्याचा हक्क त्यांनी गमावला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.