तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

हा अहंकार वाटेल पण मीच सर्वोत्तम… शाहरुखसारखा आत्मविश्वास हवा असेल तर करा एकच गोष्ट

0 55

मुंबई : गेली चार वर्षे व्यावसायिक अपयश पाहिलेला तसेच कुटुंबावरील संकटामुळे अडचणी सापडलेला अभिनेता शाहरुख खान सोमवारी बऱ्याच काळानंतर प्रसारमाध्यमांसमोर हजर झाला. ‘पठाण’ चित्रपटाच्या झळाळत्या यशानंतर शाहरुखने पुन्हा ‘किंग खान’च्या थाटात पत्रकारांशी एकतर्फी संवाद साधला. ‘गेली चार वर्षे मी या चार दिवसांत विसरलो!’, असा आनंद त्याने यावेळी व्यक्त केला आणि ‘होय, मी सर्वोत्तम आहे’, असे प्रशस्तिपत्रही स्वत:च दिले.

बॉयकॉटचा विरोधी ट्रेंड चालवलेल्या ‘पठाण’ने अवघ्या चार दिवसांत ५०० कोटी रुपयांच्या कमाईचा पल्ला पार केला आहे. चार वर्षांपूर्वी अभिनेता शाहरुखचा ‘झीरो’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. सिनेमागृहात त्याने आपटी खाल्ली. त्यानंतर गेली तीन वर्षे शाहरुख मोठ्या पडद्यावर दिसला नव्हता. ‘माझा यापूर्वीचा चित्रपट ‘झीरो’ सिनेमागृहात चालला नाही. मी वेगळा व्यवसाय करण्याचा विचार करत होतो. हॉटेल उभारण्याचा विचार होता.’

‘मला कधी कधी भीती वाटते, वाईट वाटते. मी दिवसातून अनेकवेळा आत्मविश्वास गमावतो. बाथरूममध्ये बसून तासनतास रडतोही. पण, मी पुढे चालत राहतो’, असे शाहरुख म्हणाला. ‘तुम्हाला माझे बोलणे अहंकारीपणाचे वाटेल. पण, होय ‘आय एम द बेस्ट… मी सर्वोत्तम आहे. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर माझ्या मनात हाच विचार असतो की, मी सर्वोत्तम आहे आणि असा सकारात्मक विचार करूनच तुम्ही काही चांगले घडवू शकता’, असे तो म्हणाला.

‘भावना दुखावण्यासाठी नव्हे…’

‘आम्ही सर्वांना आनंद वाटण्यासाठी चित्रपट बनवतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न नसतो. मनोरंजनासाठी आम्ही सिनेमा बनवतो’, असेही शाहरुख म्हणाला. ‘मी भाग्यशाली आहे; कारण माझे कोट्यवधी चाहते आहेत. सिनेमा कितीही कमाई करील; पण, माझ्यासाठी माझ्या चाहत्यांचा आनंद सर्वांत महत्त्वाचा आहे’, असे त्याने सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.