Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

त्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी… अवधूत गुप्तेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; एकच कारण

21

मुंबई- ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गाणं महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात रुजलेलं आहे. या गाण्याने सगळ्यांनाच महाराष्ट्राची थोरवी ऐकवली. या गाण्याने महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने वर्णन केलं. शाहीर साबळे यांच्या आवाजाने समृद्ध झालेलं आणि कवी राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गाण्यातील दोन कडव्यांना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी घेतला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीपासून हा निर्णय अंमलात आणला जाईल. याबद्दल एका जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी लोकप्रिय दिग्दर्शक, गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

हे पत्र अवधूतने इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. या पत्रात त्याने लिहिलं आहे की, ”जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीत म्हणून स्वीकारण्याच्या निर्णयाचे मी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून प्रचंड कौतुक आणि स्वागत करतो. महाराष्ट्राच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा सार्थ अभिमान या गाण्याच्या शब्दा शब्दात ठासून भरला आहे. तो अभिमान केवळ मराठी माणसापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण देशाला, किंबहुना जगाला सुद्धा ऐकू जाईल इतक्या आवाजात, विविध प्रकारे, विविध ठिकाणी, विविध मार्गाने आणि विविध भाषांमधून दवंडी पिटून सांगायला हवा.


पुढे या पत्रात लिहिलंय, ‘आता राज्यगीताचा सन्मान राखणं हे बंधनकारक होईल हे स्वागतार्ह परंतु सादरीकरणाच्या नियमावलीमुळे या गीताचा जगभर पसरत असलेला परिमळ उलट प्रतिबंधीत होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. काही वर्षांपूर्वी पुरोगामी विचारांनी भारताचा झेंडा फडकवण्याचे नियम शिथिल केल्याने ज्या प्रकारे आता गल्लीबोळात, नाक्यानाक्यावर तिरंगा डौलात फडकवताना दिसतो. त्याचप्रकारे आता हे नवीन महाराष्ट्र राज्यगीत महाराष्ट्राच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सतत ऐकू येवो हीच आई एकविरेचरणी प्रार्थना.’ त्याची ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गीत सादर करण्यासाठी असलेल्या नियमावलीमुळे गीताला राज्यगीत म्हणून घोषित करण्यामागचा हेतू अर्धवट राहू नये असं त्याने पत्रात म्हटलं आहे.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.