तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

परत येतायंत तुमचे आवडते जय-आदिती अन् जान्हवी-श्री! झी मराठीवर दाखवणार जुन्या मालिका

0 27

मुंबई: झी मराठीवरील अनेक जुन्या मालिकांनी एक काळ गाजवला आहे. अगदी सकाळच्या आणि दुपारच्या वेळेत असणारे कार्यक्रमही संध्याकाळपासून दाखवण्यात येणाऱ्या मालिकांसोबतच टीआरपी यादीत अव्वल असायचे. मात्र अलीकडे झी मराठीचा टीआरपी मोठ्या प्रमाणात घसरला आहे. या वाहिनीवरील एखादीच मालिका टॉप १० टीआरपी यादीमध्ये दिसते. त्यामुळे चॅनेलकडून एक नवा फंडा वापरण्यात येतोय, अशी चर्चा आहे. झी मराठीवरील जुन्या दोन मालिका पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रेक्षकांमध्ये याविषयी उत्साह पाहायला मिळाला.

झी मराठीने अलीकडेच दोन जुन्या मालिका नव्याने सुरू करण्यात येण्याची घोषणा केली. या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ज्यावेळी या मालिका प्रसारित होत होत्या, तेव्हा हटके विषयांमुळे त्या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. ‘होणार सून मी ह्या घरची’ आणि ‘का रे दुरावा’ या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येतील. या मालिकांमधील अनेक कलाकार अजूनही त्यांच्या पात्रांच्या नावाने ओळखले जातात.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये लुडो खेळताना मिळाला आयुष्यभराचा जोडीदार; वनिता खरात-सुमितची हटके लव्ह स्टोरी

कधी सुरू होणार या जुन्या मालिका?

१३ फेब्रुवारीपासून ‘होणार सून मी ह्या घरची’ आणि ‘का रे दुरावा’ या मालिका पुन्हा एकदा सुरू होत आहे. जय-आदितीची मालिका संध्याकाळी ४ वाजता तर जान्हवी-श्रीची मालिका संध्याकाळी ५ वाजता झी मराठीवर पाहता येईल. या मालिका सुरू होत असल्याने आणखीही काही जुन्या मालिका सुरू होतील, अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे. झी मराठीने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवरील कमेंट्सनुसार प्रेक्षक ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘जय मल्हार’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘आभाळमाया’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’ या मालिकाही पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी करतायंत.


हे वाचा-आयुष्यात कधीही लग्न करू नका… सिद्धार्थ जाधवने शेअर केलेला Video चर्चेत

प्रेक्षकांच्या अशाही कमेंट्स आल्या आहेत की ‘नव्या मालिका चालत नसल्याने जुन्या मालिका सुरू केल्या जात आहेत’. आता झी मराठी टप्प्याटप्प्याने जुन्या मालिका सुरू करणार का आणि या नव्या प्रयोगाला किती प्रतिसाद मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रेक्षकांच्या आग्रहाखातरच ‘का रे दुरावा’ आणि ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिका पुन्हा दाखवण्यात येतील, असं बोललं जात आहे. मात्र अशीही चर्चा आहे की घसरलेल्या टीआरपीला सावरण्यासाठी हा नवा फंडा वापरला जाणार आहे.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.