तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

ज्याची स्वप्न पाहिली ते खरं झालं; मधुराणीच्या आनंदाला उरला नाही पारावार, शेअर केली खास पोस्ट

0 56

मुंबई- ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती म्हणजे मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या भावना आपल्या पोस्टमधुन चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहतेही भरभरून प्रतिसाद देत असतात. नुकतीच मधुराणीची अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली. तिला दिव्यत्वाची अनुभूती आली. गेलं वर्षभर अरुंधती एका आजाराचा सामना करत आहे. त्याबद्दल तिने आपल्या पोस्टमधून सांगितलं होतं. मात्र या प्रवासात तिला अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या प्रवचनांनी खूप मदत केली. आता मधुराणीची ती इच्छा काय होती हे तिने एक पोस्ट करत सांगितलं आहे.

मधुराणीने तिचे पुरस्कार घेतानाचे फोटो शेअर करत लिहिलं, ‘दिव्यत्वाची प्रचिती, जय गुरुदेव. पूज्य गुरुजी श्री श्री रविशंकर ह्याच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करण्याचा एक अतिशय दैवी योग माझ्या आयुष्यात आला. त्यांच्या समोर गुरुवंदना गायले. त्यांचे आशीर्वाद लाभले. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही. माझ्यासाठी गेलं वर्ष खूप काही शिकवून जाणारं होतं. टोकाचे मानसिक चढउतार अनुभवले. त्याचे तब्येतीवर होणारे परिणाम भोगले. ह्या प्रवासात माझ्या हे अगदी लक्षात येत होतं की मला स्वतः वर काम करायला हवंय. मनाची स्थिरता मिळवायला हवीय. मनाची ताकद वाढवायला हवीय. मला मार्ग सापडत नव्हता आणि एक दिवस अचानक तो सापडला. पूज्य गुरुजी श्री श्री रविशंकर ह्याची सुदर्शन क्रिया. मी खूप पूर्वी शिकले होतेच. पुन्हा एकदा शिकले आणि नियमित करू लागले.’


‘मग सहज समाधी ध्यान, मग ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्स. ह्या सगळ्यामुळे मला काय आणि किती लाभ झालेत हे मला शब्दांत सांगता येणं कठीण आहे. जसजसा मी सराव करत होते, गुरुजींची अनेक प्रवचनं ऐकत होते, तशी त्यांना प्रत्यक्षात भेटायची इच्छा प्रबळ होत होती. अनेक काळ ते भारताबाहेर असतात, भारतात असले तर प्रचंड बिझी असतात. कधी आणि कसे भेटणार?मनाततली इच्छा मनातच राहणार असे वाटत होते आणि अचानक महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने श्री किरण जोशी ह्यांचा फोन आला आणि ते म्हणाले आम्ही असा असा कार्यक्रम करतोय त्यात विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी ककरणाऱ्यांना पुरस्कार देतोय, त्यात तुम्हाला द्यायचाय आणि तो ही गुरुजींच्या हस्ते.’


माझा विश्वास बसेना, मी पुन्हा एकदा सगळं विचारलं. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. पण त्या दिवशी शूट असणार होतं, कसं होणार. पण म्हणतात न गुरू नी बोलावलं म्हंटल्यावर सगळं आपोआप घडत जातं. मी सेटवर माझ्या मनातली ही इच्छा आमच्या दिग्दर्शकांना सांगितली, त्यांनीपण कोऑपरेट केलं, सगळं सांभाळून मला ह्या सत्काराला जाता येईल असं बघितलं. मी इतकीच इच्छा व्यक्त केली होती की प्रत्यक्ष आशीर्वाद घेता यावेत. पण लाभलं ते किती अद्भुत! जय गुरुदेव.’ तिची ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.