
Tej Police Times
या तीन कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये १.९७ लाख नव्या कर्मचाऱ्यांना सामावून घेतले. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात याच कंपन्यांनी केवळ ६८,८८६ कर्मचाऱ्यांची भरती केली. अमेरिका, युरोपातील बँकिंग संकट आणि मंदीच्या शक्यतेमुळे कंपन्यांनी कर्मचारी भरतीचे प्रमाण कमी केले आहे. एका अहवालानुसार, कर्मचारी भरतीचे घटलेले प्रमाण मंदीचे निदर्शक आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ‘टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस), ‘इन्फोसिस’ आणि ‘एचसीएल टेक’ या कंपन्यांनी अतिशय कमी भरती केली. आर्थिक वर्ष २०२१-२२च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२-२३च्या शेवटच्या तिमाहीत या तिन्ही कंपन्यांनी ९८.७ टक्के कमी कर्मचारी जोडले. आर्थिक वर्ष २०२२-२३च्या शेवटच्या तिमाहीत या कंपन्यांनी केवळ ८८४ कर्मचारी जोडले. आर्थिक वर्ष २०२१-२२च्या चौथ्या तिमाहीत कंपन्यांनी एकत्रितपणे ६८,२५७ जणांना नोकऱ्या दिल्या.
‘टीसीएस’चे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी मिलिंद लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये कंपनीने एकूण २२,६०० कर्मचाऱ्यांची भरती केली. त्याच वेळी आर्थिक वर्ष २०२२मध्ये कंपनीने सर्वाधिक एक लाख तीन हजार ५४६ कर्मचाऱ्यांची भरती केली.
आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये ‘इन्फोसिस’ने एकूण २९,२१९ कर्मचाऱ्यांची भरती केली. त्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२१-२२मध्ये कंपनीने ५४,३९६ कर्मचाऱ्यांची भरती केली. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) कंपनीने केवळ ३,६११ कर्मचाऱ्यांना नोकरी दिली. आर्थिक वर्ष २०२१-२२च्या याच तिमाहीत कंपनीने २१,९४८ कर्मचारी सामावून घेतले होते.
आर्थिक वर्ष २०२१-२२च्या तुलनेत ‘एचसीएल टेक’ने आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये कंपनीने नोकरभरती करण्यात हात आखडता घेतला. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने १७,०६७ जणांना नोकरीत सामावून घेतले. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात कंपनीने ३९,९०० जणांना नोकरी दिली. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने ३,६७४ जणांना नोकरी दिली. आर्थिक वर्ष २०२१-२२च्या याच तिमाहीत कंपनीने ११,००० जणांची भरती केली होती.
१.९७ लाख
तीन कंपन्यांची २०२१-२२मधील भरती
६८,८८६
तीन कंपन्यांची २०२२-२३मधील भरती
Recover your password.
A password will be e-mailed to you.