
Tej Police Times
आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. महाभारत, पुराणे लिहिलेल्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा दिवस. या वर्षी सोमवार, ३ जुलै २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी गुरुंचे पूजन केले जाते. संगीत, साहित्य क्षेत्रात हा दिवस विशेष साजरा करण्यात येतो. अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात तो गुरु, असे सांगितले जाते.
गुरुवार, ६ जुलै २०२३ रोजी आषाढ वद्य चतुर्थी आहे. प्रत्येक मराठी महिन्याची वद्य चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. गणेश भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात. गणपतीचे नामस्मरण करून संकष्ट चतुर्थी व्रत आचरिले जाते. गणपती उपासकांसाठी संकष्ट चतुर्थीला अधिक महत्त्व असते. चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. महाराष्ट्रात प्रत्येक शहरात चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी असल्याने त्या त्या वेळेनुसार चंद्रोदय झाल्यानंतरच नैवेद्य दाखवला जातो. यानंतर गणेश उपासक, भाविक दिवसभराचा उपवास सोडतात.
आषाढ महिन्यातील वद्य पक्षात येणारी एकादशी कामिका एकादशी म्हणून ओळखली जाते. हा दिवस भगवान श्रीविष्णू यांची आराधना व पूजेसाठी सर्वश्रेष्ठ असतो. कामिका एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्ती मिळून इच्छित फलप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. या वर्षी गुरुवार, १३ जुलै २०२३ रोजी कामिका एकादशी आहे. प्राचीन ग्रंथांनुसार, कामिका एकादशीचे व्रत महत्त्व स्वतः ब्रह्मदेवाने देवऋषी नारदांना सांगितले आहे.
हरियाली दर्श अमावस्या आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरा केला जातो. ही तिथी सोमवारी येत असल्याने तिला सोमवती अमावस्या असेही म्हटले जाईल. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण आणि श्राद्ध विधी केले जातात. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा, हवन, जप तपश्चर्या आणि ध्यान केल्याने मनुष्य मोक्ष प्राप्त होतो आणि सर्व दुःख दूर होतात.
१८ जुलै पासून अधिक श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यात अधिकमास, मलमास किंवा पुरुषोत्तम महिना सुरू होत आहे, त्यामुळे श्रावण एक नाही तर दोन महिन्यांचा आहे. हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे आणि श्रावणमध्ये मलमास पाळल्याने आपल्याला हरी आणि हरचा आशीर्वाद मिळू शकतो. ज्या चांद्रमासात सूर्याचे संक्रमण नसते, म्हणजेच संक्रांती नसते, त्या महिन्याला मलमास किंवा पुरुषोत्तम महिना म्हणतात. या महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. मलमास किंवा पुरुषोत्तम महिन्यात भगवान विष्णूची पूजा आणि ध्यान केल्याने सर्व संकटे दूर होतात.
अधिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कमला, पद्मिनी किंवा पुरुषोत्तम एकादशी म्हणतात. या एकादशीला भगवान विष्णूची उपासना केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि धन-समृद्धी मिळते. कमळ हे भगवान विष्णूला समर्पित असून या महिन्यात एकादशी तिथी असणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. हे व्रत केल्याने भगवान विष्णूसह लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
Recover your password.
A password will be e-mailed to you.