
Tej Police Times
‘लव लग्न लोचा’ मालिकेतील राघवेंद्र असो, किंवा सध्या बहुचर्चेत ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतील राजवर्धन असो… त्याच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला त्याने पुरेपूर न्याय देत, तो नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत आला.
१६ ऑगस्ट १९८८ रोजी मुंबईत जन्म झालेल्या विवेक सांगळेचे संपूर्ण बालपण मुंबई काळाचौकीतील अभ्युदय नगरमध्ये गेले. इथेच विवेकचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. दहावी झाल्यावर आपण कॉमर्समधूनच पुढील शिक्षण घ्यायचे असे विवेकने मनाशी ठरवलेले असताना. काही नातेवाईकांच्या सांगण्यावरून त्याने अकरावीला विज्ञान शाखेची निवड केली.
अकरावी सायन्ससाठी त्याने मुंबईच्या कीर्ती कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन महाविद्यालयीन शिक्षणाला सुरुवात केली. परंतु, बारावीला म्हणावे तसे यश मिळालेले नाही.
बारावीतील मिळालेल्या कमी गुणांमुळे डगमगून न जात विवेकने पुन्हा सुरुवात करत डी. वाय पाटील कॉलेजमध्ये आयटी विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. परंतु, इथेही त्याचे मन रमत नव्हते. अखेर व्हायचा तो गोंधळ झाला ३ वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रमाबरोबरही सूत जुळलं नाही.
परंतु, “जे नशिबात असतं त्या गोष्टी योग्य वेळी तुमच्या आयुष्यात येतात आणि तुमच्यातील मेहनतीच्या जोरावर त्या-त्यावेळी स्वप्न पूर्ण होतात”, या मताचा असणाऱ्या विवेकचा अभिनयाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. करिअर म्हणून अभिनयाचे क्षेत्र निवडावे असं काहीच ठरलेलं नसताना तो या क्षेत्रात आला आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला.
मुळात, कुकिंगची आवड असणाऱ्या विवेकाला सुरवातीला शेफ व्हावं असाही वाटत होत. त्यामुळे, “जर मी अभिनेता नसतो तर, एक उत्तम शेफ नक्की बनलो असतो असम विवेक आवर्जून सांगतो.”
२०१३ ला सह्याद्री वाहिनीच्या ‘कल्पतरु’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेच्या माध्यमातून विवेकने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे, ‘देवयानी’, ‘लव्ह लग्न लोचा’, ‘आम्ही दोघी’, ‘आई माझी काळूबाई’ सध्याची ‘भाग्य दिले तू मला’ अशा मालिकांमधील विविध भूमिकांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.