तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

सत्र परीक्षांबाबत शिवाजी विद्यापीठाचा मोठा निर्णय!

0 50

पदवीपर्यंतचे शिक्षण असो किंवा पदव्युत्तर पदवी, आपल्याकडे अचानक लांबणाऱ्या परीक्षा, वेळापत्रकांचे घोळ, ऐनवेळी उदभवलेल्या अडचणी आणि परिणामी रखडणारे निकाल याचा नाहक मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. दरवर्षी अनेक विद्यापीठांमध्ये अशा घटना घडत असतात, त्यावर चर्चा होतात पण पुन्हा परिस्थिती जैसे थे राहते.

पण आता ही अडचण कायमची मिटणार आहे. निदान कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची यातून सुटका झाली आहे. कारण कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. इथून पुढे कोल्हापूर विद्यापीठात नियोजित वेळेच्या तीन महिने आधीच सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. अत्यंत महत्वाच्या अशा या निर्णयाने विद्यार्थ्यांनीही स्वागत केले आहे.

सत्र परीक्षांच्या ठरलेल्या वेळेआधीच वेळापत्रक दिले तर विद्यार्थ्यांना अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळेल आणि विद्यार्थी परीक्षेच्या अनुषंगाने अधिक चांगली तयारी करू शकतील, या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय प्राध्यपकांनाही परीक्षा आणि निकाल याची पूर्वतयारी वेळेआधीच आणि नियोजनबद्ध करता येईल, अशी भूमिका विद्यापीठाने मांडली आहे.
याची सुरुवात हिवाळी सत्र परीक्षेपासून करण्यात आली आहे. ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या हिवाळी सत्र पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने जुलैमध्येच जाहीर केले.
(वाचा : मातृभाषेला कमी लेखू नका, ‘मराठी’ भाषेतही आहेत करियरच्या ‘या’ खास संधी..)

विद्यापीठाची भूमिका…

कोरोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये बरेच गोंधळ झाले. कुठे वेळापत्रक कोलमडले तर कुठे नियोजनात अडचणी आल्या. पुढे मूल्यांकन उशिरा झाले आणि निकाल जाहीर करायला उशीर झाला. परिणामी विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षणाचे नियोजनही बिघडले. त्यामुळे परीक्षा आणि निकाल याचे नियोजन आणि व्यवस्थापन नेटके व्हावे, त्यात कोणतीही गडबड होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.
यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. विद्यापीठाच्या परीक्षा नियुक्ती समितीने केलेल्या वेळापत्रकाची तपासणी या समितीकडून केली गेली. या समितीच्या मान्यतेनंतर परीक्षा मंडळाने दहावी, बारावीच्या धर्तीवर शैक्षणिक वर्षातील सत्राच्या सुरुवातीलाच परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्याचे ठरवले आणि हिवाळी सत्रापासून सुरूवात केली. म्हणून ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत होणाऱ्या पदवी, पदव्युत्तर परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने २८ जुलै रोजीच जाहीर केले.

विद्यार्थ्यांचा फायदा:

परीक्षांचे वेळापत्रक वेळेआधी जाहीर झाल्याने ऐनवेळी विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येणार आहे. शिवाय परीक्षा डोळ्यापुढे ठेऊन विद्यार्थी अभ्यास करतील. या निर्णयाने निकालही वेळेत जाहीर होतील. जेणेकरून विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी कोणत्याही अडचणीविना पुढे जाऊ शकतील. या निर्णयाचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
(वाचा: Career Guidance: करिअर निवडण्यापूर्वी या सहा गोष्टी आवर्जून करा! कधीही पश्चाताप होणार नाही..)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.