
Tej Police Times
राज्यात तलाठी भरतीच्या रिक्त जागांसाठी भूमी अभिलेख विभागाने परीक्षा घेतली. तलाठ्यांच्या चार हजार ४६६ जागांसाठी सुमारे १० लाख ४१ हजार ७१३ इतक्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी सुमारे आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. अर्जाची संख्या मोठी असल्याने तीन टप्प्यांत आणि एका दिवसांत तीन सत्रांत घेण्यात आली होती. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदविण्यासाठी २८ सप्टेंबर ते आठ ऑक्टोबरदरम्यान मुदत देण्यात आली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण पाच हजार ७०० प्रश्नांपैकी दोन हजार ८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांनी नोंदविले होते. त्या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी नऊ हजारांहून अधिक आक्षेप घेण्यात आले होते. ते आक्षेप टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले होते.
परीक्षा क्रमांकानुसार यादी :
तलाटी परीक्षेच्या मुख्य समन्वयक सरिता नरके म्हणाल्या, ‘उमेदवारांची जास्त संख्या असल्याने गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी मोठा कालावधी लागला आहे. गुणवत्ता यादी ही परीक्षा क्रमांकानुसार जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली अशा सर्वांचे गुण या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. प्रत्येक उमेदवारासमोर त्याने संबंधित परीक्षेतील जिल्ह्याचे नावही यादीमध्ये दर्शविण्यात आले आहे. गुणवत्ता यादी तयार करताना एका सॉफ्टवेअरची मदत घेण्यात आली आहे त्यानुसार प्रत्येक क्षेत्रातील शंभर प्रश्नांपैकी काठीण्य पातळीनुसार हे गुण देण्यात आले आहेत. हे काम पूर्णपणे सॉफ्टवेअरनेच केलेले असून त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप नाही. या प्रक्रियेला सामान्यीकरण असे म्हटले जाते.’
निवड यादी तीन आठवड्यात :
सध्या जाहीर करण्यात आलेली गुणवत्ता यादी आहे. निवड यादी प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी २३ जिल्ह्यांमध्ये अंतिम निवड यादी जाहीर करण्याचे काम सोमवारपासून हाती घेण्यात येणार आहे. पुढील तीन आठवड्यांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार असून अन्य १३ जिल्हे पेसा क्षेत्रातील आहेत. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असून निकालानंतर गुणवत्ता यादी, निवड यादीची प्रक्राय सुरू करण्यात येणार असल्याचे नरके यांनी सांगितले.
२३ जिल्ह्यातील उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर :
तलाठी परीक्षेतील २३ जिल्ह्यातील उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरीत १३ जिल्हे पेसा क्षेत्रातील ५७४ जागांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
– सरिता नरके, राज्य समन्वयक, तलाठी परीक्षा
Recover your password.
A password will be e-mailed to you.