Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- ‘काही नेत्यांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ’
- शरद पवारांचा अप्रत्यक्षपणे टोला
- पुण्यातील कार्यक्रमात केंद्रावरही निशाणा
पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज मंचर येथे दिवंगत खासदार किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी किसनराव बाणखेले यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच राज्यातील सध्याच्या राजकारणावरही भाष्य केलं.
‘अलिकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष उभा राहिल्याचं दिसत आहे. एकमेकांवर टीका करताना मर्यादेचा विसर पडत आहे. काही जणांवर तर वक्तव्य मागे घेण्याची आणि दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे किसनराव बाणखेले विरोधी पक्षात असतानाही जसं वागायचे त्याची कमतरता दिसत आहे,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीवरून केंद्र सरकारवरही निशाणा साधला. ‘मी १० वर्ष कृषिमंत्रीपद सांभाळलं आहे. मात्र आम्ही कधीही शेतकऱ्यांवर त्यांचा शेतमाल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आणली नाही,’ असं म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली.
या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना खासदार संजय राऊत आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह इतरही नेते उपस्थित होते.
दरम्यान, शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमात गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने टीका होत आहे.