
Tej Police Times
परतूर तालुक्याला काल रात्री पावसाने झोडपले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.परतूर तालुक्यातील बामणी – वलखेड रोडवरील बामणी गावाजवळील पुलाला दिवसभर पावसाने आलेल्या पुराच्या पाण्यात 3 जण वाहून गेल्याची घटना घडली. यामध्ये २ जणांना वाचवण्यात यश आलं असून एकजण बेपत्ता आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी
दरम्यान, जालना येथील कृषि विज्ञान केंद्र खरपुडी येथील शास्त्रज्ञांनी आपले शेतकऱ्यानं कर्तव्य समजून जालना तालुक्यातील मौजे कचरेवाडी, वानडगाव, साळेगाव आणि हडप सावरगाव येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली. तसेच या पावसामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना सुचविल्या. तातडीने दिलेल्या या भेटीत कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने, पीक संरक्षण तज्ज्ञ अजय मिटकरी, मृदशास्त्रज्ञ राहुल चौधरी आणि कृषि अभियंता पंडीत वासरे यांचा समावेश होता.
या भेटीदरम्यान पाहणी केली असता कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून आले. या पश्वभूमीवर या चारही गावात काही ठिकाणी बैठक घेऊन तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन करण्यात आले.
Jalna Flood : पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचे वाचवले प्राण; गोंदी येथील युवकांचे साहसिक कार्य
भेटीदरम्यान शास्त्रज्ञांनी दिलेला सल्ला खालीलप्रमाणे…
१. सोयाबीन पीक सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून त्यावर करपा रोग येण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे, यामुळे पीक उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. त्यापासून बचाव करण्यासाठी पाऊस उघडल्याबरोबर पिकावर टेबुकोनाझोल (१० लिटर पाण्यात १२ मिली) किंवा कार्बेनडेंझीम (१० लिटर पाण्यात १० ग्रॅम) या बुरशीनाशकांची फवारणी करण्यात यावी.
२. शेतात पाणी साचल्यामुळे तूर व कापूस पिकात मर रोग येऊ शकतो, त्यासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची दीड ते दोन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
३. सततच्या पावसामुळे वाढलेल्या अर्द्रतेमुळे शेंदरी बोन्डअळीचे पतंग मोठ्या प्रमाणात बाहेर येतील, त्यासाठी फेरोमोन सापळे प्रति एकरी दोन वावरून त्यात पडणाऱ्या पतंगावर लक्ष ठेवावे व पतंगाची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर गेल्यास तंज्ञांच्या मदतीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
४. मोसंबी पिकात पाण्याचा योग्य प्रकारे निचरा करावा व योग्य त्या बुरशीनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा.
५. पाणी साचलेल्या शेतातून पाण्याचा योग्य प्रकारे निचरा करावा.
६. कापूस तूर या पिकांना कुठल्याही प्रकारे जमिनीतून रासायनिक खते देऊ नयेत, त्याऐवजी फवारणीतून द्रवरूप खते द्यावीत जेणेकरून ती पिकांना परिणामकारकरित्या शोषण करता येतील.
रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टीचा धोका टळला पण…
७. रब्बी ज्वारीची पेरणी १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत दोन ओळीत १८ सेंमी अंतर ठेवून करावी.
८. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी केवळ पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, रेशीमउद्योग यासारख्या जोडधंद्यांचा अवलंब करण्यात यावा असाही सल्ला या वेळी देण्यात आला.
एकाच दिवशी १७० मिमी पाऊस झाल्यामुळे अनेक शेते खरडून गेली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या २५ वर्षात एवढा मोठा पाऊस पहिल्यांदाच पडल्याचे भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी सांगितले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.