Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अतिसंशय ही समस्या, ‘ईव्हीएम’बाबत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले

9

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : ‘प्रत्येक गोष्टीवर शंका घेता येत नाही आणि ईव्हीएमच्या प्रत्येक पैलूवर टीका करण्याचीही गरज नाही’, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केली. निवडणुकीदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रात (ईव्हीएम) नोंदवलेल्या मतांशी सर्वच्या सर्व ‘व्हीव्हीपॅट स्लीप’ (मतदार-पडताळणीयोग्य पेपर ऑडिट ट्रेल) जुळवण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने, ही टिप्पणी करताना निकाल राखून ठेवला.मतदान केल्यानंतर मतदारांना ‘व्हीव्हीपॅट स्लीप’ देता येणार नाही का, अशी विचारणा न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे केली. त्यावर तसे करण्यात मोठा धोका आहे, असे आयोगाने सांगितले. तसे केल्यास मताच्या गोपनीयतेशी तडजोड होईल आणि बूथच्या बाहेर त्याचा गैरवापर होऊ शकतो. इतर लोक ते कसे वापरू शकतात, हे आम्ही सांगू शकत नाही, असे आयोगाने सांगितले.
शिवसेनेतील फुटीचा भाजपला राजकीय फायदा, पारंपरिक युतीतला तिसरा मतदारसंघ शिंदेंनी गमावला

याचिकाकर्ते असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सतर्फे (एडीआर) प्रशांत भूषण, गोपाल शंकरनारायण, संतोष पॉल आणि संजय हेगडे, निवडणूक आयोगाच्या वतीने मनिंदरसिंग तर केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला.

‘विकसित देशांनी ही व्यवस्था सोडून दिली आहे’, या युक्तिवादावर न्या. दत्त यांनी, इतर देश भारतापेक्षा अधिक विकसित आहेत, असे समजू नका असे सुनावले. ‘कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले असेल तर तुम्ही त्याचे कौतुक केले पाहिजे. जर काही सुधारणा केल्या गेल्या असतील तर त्यांनी ते तुम्हाला का समजावून सांगावे? ते कायदेशीर आहे. अति-संशय ही एक मोठी समस्या आहे’, अशा शब्दांत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले.

एका वकिलाने बांगलादेशसारख्या विदेशी मतदान प्रणालींकडे लक्ष वेधले. त्यावेळी न्यायालयाने म्हटले की, ‘आमची प्रणाली चांगले काम करत आहे हे तुम्हाला माहिती आहे व मतपत्रिकांच्या काळात काय झाले हे आम्हालाही माहिती आहे. आमच्या मतदारांची संख्याही वाढली आहे आणि हे लोकांचा विश्वास वाढल्याचे दर्शवते.’

‘ईव्हीएम’संबंधित याचिका वारंवार दाखल केल्याने मतदारांच्या निवडीची थट्टा होत आहे, असे सांगून मेहता यांनी, निवडणुकीच्या वेळीच अशा याचिका दाखल केल्या जातात, याकडे लक्ष वेधले. त्यावर खंडपीठाने त्यांना थांबवून स्पष्ट केले की, ही याचिका यापूर्वी दाखल करण्यात आली होती. ती सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित होती. याचिकांच्या सुनावणीस विलंब झाला. त्यासाठी याचिकाकर्त्यांना दोष देता येणार नाही.

‘त्या’ मतांबाबत पडताळणीचे आदेश

केरळमधील कासारगोड येथे झालेल्या ‘ईव्हीएम’च्या ‘मॉक ड्रील’मध्ये, किमान चार ईव्हीएममधून भाजपल अधिक मत मिळत असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर या खंडपीठाने निवडणूक आयोगाला याबाबतच्या अहवालाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. प्रशांत भूषण यांनी प्रसारमाध्यमातील लेखाद्वारे समोर आलेल्या या प्रकाराकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. ही निवडणूक प्रक्रिया आहे, त्यात पावित्र्य असायला हवे’ असे खंडपीठाने बजावले. याबाबत केरळमधील डाव्या पक्षांनी तक्रार केली होती.

न्यायालय म्हणाले…

-अतिसंशय ही एक मोठी समस्या बनली आहे.

-इतर देश भारतापेक्षा अधिक विकसित असल्याचे समजू नका.

-मतपत्रिकांच्या काळात काय झाले हे आम्हालाही माहिती आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.