Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयातील ऐतिहासिक पान म्हणजे लोंगेवाला युद्ध. १९७१ मध्ये झालेल्या युद्धातील भारतीय सैन्याच्या शौर्याची गाथा वर्णन करणारं स्मारक भारत-पाकिस्तान सीमावर्ती भागात झाले. लोंगेवाला-तनोट-बबलियान असा ‘सीमा पर्यटनाचा’ त्रिकोण साकारण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र, ते तोकडे पडल्याचे चित्र आहे. तनोट माता मंदिराशेजारी असणाऱ्या तेथील सीमा सुरक्षा दलाच्या कार्यालयात सीमा पाहण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. परवानगीचे सोपस्कार पार पाडल्यानंतर कनोटपासून आत १९ किलोमीटर अंतरावर ही भारत-पाकिस्तान सीमा आहे. विस्तीर्ण अशा थारच्या वाळवंटातून दोन-तीन ठिकाणी आपले ‘चेकिंग’ झाल्यावर आपण येथे पोहोचतो. तुरळक पर्यटक ही सीमा पाहण्यासाठी आलेले दिसतात. पर्यटनाच्या हंगामातही इथे कमी लोक येतात, असे सांगितले जाते. राजस्थानच्या पर्यटनात एकूणच तनोट माता मंदिर आणि या भारत-पाक सीमेच्या पर्यटनाचं प्रमाण खूपच कमी असल्याचे स्थानिक सांगतात. तिथे गेल्यावर एका मोकळ्या मैदानात फायबरच्या खुर्च्यांचे स्टँड उभारलेले दिसते. मात्र, यातील अनेक खुर्च्या तुटल्या असून, येथील वातावरणातील बदलांचा मोठा फटका या स्टँडला बसला आहे. ‘वाघा बॉर्डर’प्रमाणे येथेही लष्कराचे संचलन करून हा भाग विकसित करण्याचा विचार होता. मात्र, एकूणच याबाबत असलेल्या अनास्थेमुळे हा सीमाभाग अतिशय उदास आणि भकास पडून आहे.
‘नियोजन फसले’
राजस्थानातील या सीमेवर ‘पर्यटन विकास केंद्र’ करण्याची योजना उत्तम होती. मात्र, त्यासाठीचे नियोजन फसले. रखरखत्या वाळवंटात बंदिस्त नसलेला स्टँड उभारण्यात आला. त्यातही फायबरच्या खुर्च्या बसविण्यात आल्या. हे सारं काही येथील नियमित वादळाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालं, असे येथे सीमा सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका जवानाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. हा सीमाभाग योग्य नियोजन करून विकसित केला गेला तर परिस्थिती नक्कीच सुधारेल, असे तनोटच्या अलीकडे असलेल्या रामगड या गावातील लुणसिंह जाम यांनी सांगितले.