Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कपिल पाटलांमुळं माझा जीव वाचला; भुजबळांनी सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग

14

हायलाइट्स:

  • जळगाव येथील ओबीसी हक्क परिषदेत भुजबळांची जोरदार फटकेबाजी
  • ओबीसींच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर साधला निशाणा
  • तुरुंगात असतानाचा किस्सा सांगत भुजबळ झाले भावुक

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (NCP Leader Chhagan Bhujbal) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. जळगाव येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह इथं आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी हक्क परिषद बोलताना भुजबळ यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. तसंच यावेळी भुजबळ यांनी ते तुरुंगात असतानाचा एक किस्साही सांगितला आहे.

‘कपिल पाटील या माणसाने माझा जीव वाचवला आहे. मला जेव्हा जेलमध्ये टाकलं तेव्हा एक-दोन वेळा माझी प्रकृती गंभीर झाली होती. बाहेर जेव्हा कळलं की भुजबळ सीरियस आहेत त्यावेळी हे कपिल पाटील विधानमंडळात उभे राहिले आणि सांगितलं की काय तुम्ही वागणूक देताय? मारून टाकणार की काय तुम्ही भुजबळ यांना? असा प्रश्न कपिल पाटलांनी विचारला होता,’ अशी आठवण सांगत यावेळी छगन भुजबळ काहीसे भावुक झाल्याचं पाहायला मिळाले.

Kailas Patil: शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील राष्ट्रवादीत; खडसेंनी हिशेब चुकता केला!

मोदी सरकारवर हल्लाबोल करताना काय म्हणाले भुजबळ?

‘ओबीसींच्या प्रश्नावर बोलले की लगेच त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्याचे प्रकार सध्या देशात होत आहेत. त्यामुळे बोलणाऱ्यानी सावध राहा,’ असं सांगत छगन भुजबळ यांनी विरोधकांना चिमटा काढला आहे. देशातील साडेसात हजार जातींना एकत्र करण्याचे महान काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. प्रत्येक जातीच्या वेगळ्या संघटना असल्या तरी जोपर्यंत सर्व एकत्र येणार नाही तो पर्यंत आपली ताकद दिसणार नाही. त्यामुळे आपल्या हक्काचे जे आहे ते आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी एकसंघ होऊन ही लढाई लढावी लागेल, असंही भुजबळ म्हणाले.

‘ती अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे’

ओबीसी हक्क परिषदेत बोलताना भुजबळ म्हणाले की, ‘देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे. मंडल निघाला तेव्हा लगेच कमंडल बाहेर पडले. खासगी क्षेत्रातही ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने मांडली आणि आज जळगावच्या ओबीसी हक्क परिषदेत आरक्षण आणि जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव मांडण्यात आला त्याबद्दल सर्वांचे कौतुक केलं पाहिजे. ओबीसींच्या प्रश्नांसाठी महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे ओबीसींच्या पाठीशी आहे. सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा आपली बाजू मांडण्यात येईल. जनतेची साथ आपल्यामागे असल्याने छगन भुजबळ कुणालाही घाबरणार नाही. गोरगरिबांसाठी सुरू असलेला हा संघर्ष आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू राहील, संघर्ष थांबणार नाही,’ असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

ओबीसींचा इम्पिरिकल डेटा देण्यास नकार हे ‘त्या’ दिशेनं पहिलं पाऊल; भुजबळांचा गंभीर आरोप

कपिल पाटील भुजबळांविषयी काय म्हणाले

‘छगन भुजबळ हे मंडल आयोगासाठी जीवावर उदार होऊन सामोरे गेले. त्यामुळे ओबीसींचे प्रश्न समोर आले, ओबीसी जागृत झाला. संसदेपर्यंत ओबीसींचा प्रश्न त्यांनी पोहोचवला. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण टिकवायचे असेल तर छगन भुजबळ यांची ताकद वाढवण्याची गरज आहे,’ असं आवाहन या मेळाव्यात बोलताना आमदार कपिल पाटील यांनी केलं आहे. ते म्हणाले की, ७० टक्क्यांपर्यंत आरक्षण देता येऊ शकेल असे संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानुसार देशातील सर्व वंचित घटकांना आरक्षण मिळेल. ओबीसी, दलित, मुस्लिम आदिवासींच्या केंद्रातील भाजप विरोधात असल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडे ओबीसींची आशा आहे ती पूर्ण करावी, असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं.

दरम्यान, जळगावातील ओबीसी हक्क परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, आमदार कपिल पाटील, आमदार अनिल पाटील, जळगावच्या महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, लोकसंघर्ष मोर्च्याच्या अध्यक्ष आणि आयोजक प्रतिभाताई शिंदे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, माजी आमदार रामहरि रुपनवर,डॉ. ए. जी. भंगाळे, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, संतोष चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, फारुख शेख, कलिम सराल, पंकज महाजन, विष्णू भंगाळे, अशोक पवार, सतीश महाजन, रवी देशमुख, अमित पाटील, विवेक जगताप, संतोष पाटील, नारायण वाघ, संजय महाजन, संजय पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.