
Tej Police Times
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या सुल्तानपूर मतदारसंघाच्या उमेदवार मनेका गांधी वृत्तसंस्थेला मुलाखत देऊन याबाबत पहिल्यांदाच मौन सोडले. ‘वरुण गांधी यांनाही आपल्या प्रचारासाठी यायचे आहे, मात्र त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशच्या सुल्तनापूर मतदारसंघात सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी निवडणुका होत आहेत. तर, पिलभित मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजीच निवडणुका झाल्या. यंदा त्यांच्यासमोर समाजवादी पक्षाचे उमेदवार रामभुआल निषाद उभे आहेत. तर, पिलभितमधून भाजपने उत्तर प्रदेशचे मंत्री जितिन प्रसाद यांना तिकीट दिले आहे.
Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकीत पावभाजी करणार कमाल? उमेदवार म्हणाला, १२ लाखाच्या लीडने विजयी होणार
वरुण गांधी यांना तिकीट नाकारल्याबद्दल आपल्याला आई म्हणून वाईट वाटले का, असे त्यांना विचारले असता, ‘मला आनंद झाला, असे तर मी म्हणू शकणार नाही. मात्र वरुण तिकिटाशिवायही चांगली कामगिरी करेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळावी, याबाबत पिलभितमधून होत असलेल्या मागणीबाबत विचारले असता, ‘हो. तो तिथे असायला हवा होता, मात्र पक्षाने याबाबत निर्णय घेतला आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात वरुण गांधी सुल्तानपूर येथून उभे राहू शकतात का की, पिलभितच त्यांची आता कर्मभूमी आहे, यावर त्यांनी ‘या क्षणाला पिलभित आणि भारतच त्याची कर्मभूमी आहे. त्याला सगळीकडे काम करू द्या,’ असे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारवर सातत्याने केलेल्या टीकेमुळे त्यांना तिकीट गमवावे लागले का, या प्रश्नावर ‘मला तरी दुसरे कोणतेही कारण दिसत नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
आठवेळा खासदार राहिलेल्या मनेका गांधी यांनी या निवडणुकीतही त्या केवळ स्थानिक मुद्द्यांवर बोलणार असल्याचे ठामपणे सांगितले. ‘कोणती कामे पूर्ण झाली आणि कोणती कामे पूर्ण करायची आहेत, यावरच ही निवडणूक लढवली जाईल. कारण राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा लोकांना या मुद्द्यांमध्येच अधिक रस असतो,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. गेल्या निवडणुकीत त्या १४ हजार मतांनी विजयी ठरल्या होत्या. आताही या निवडणुकीत त्या चांगले यश मिळवू शकतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सॅम पित्रोदा यांनी उपस्थित केलेल्या वारसा करालाही त्यांनी विरोध केला. एनडीए पुन्हा सत्तेत आल्यावर तुम्हाला मंत्रिपद मिळेल, यावरही त्यांनी असे निर्णय मी घेत नाही, असे स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशात भाजपचा राम मंदिर हा मुद्दाच सर्वांत प्रभावशाली ठरत आहे का, या प्रश्नावरही त्यांनी सुल्तानपूरमध्ये हा तुलनेने कमी महत्त्वाचा मुद्दा असल्याचे अधोरेखित केले. अयोध्या हे सुल्तानपूरच्या शेजारीच आहे. ‘अयोध्येतील मंदिरामुळे नागरिक खूश आहेत. या मुद्द्याला सर्वांच्या हृदयात स्थान असले तरी हा प्रचाराचा मुद्दा नाही,’ असे त्या म्हणाल्या.
Recover your password.
A password will be e-mailed to you.