
Tej Police Times
उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बनगाव परिसरालाही बंगाली साहित्याचा वारसा लाभलेला आहे. ‘पाथेर पांचाली’चे लेखक विभूती भूषण बंडोपाध्याय यांची ही जन्मभूमी. ‘पाथेर पांचाली’चे लेखन इथेच झाल्याचे स्थानिक सांगतात. तत्कालीन ब्रिटिश सरकारने बनगावकडे जाण्यासाठी १८८२ मध्ये रेल्वेमार्ग टाकला. आजही कोलकात्याला जोडणारा हाच मुख्य दुवा आहे. बनगाव हा देशाची फाळणी होण्यापूर्वी बंगाल प्रांतातील जेस्सोर जिल्ह्याचा भाग होता. पूर्व पाकिस्तान (नंतरचा बांगलादेश) निर्माण झाल्यानंतर जेस्सोर जिल्ह्याचे विभाजन झाले. यात बनगाव भारताच्या वाट्याला आले. केवळ १५ टक्के भाग शहरी असलेल्या या लोकसभा मतदारसंघाची निर्मिती २००९मध्ये झाली. फेररचनेनंतर तो अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तत्पूर्वी, हा सर्व भाग बरसत मतदारसंघाला जोडलेला होता. बनगावमधून भाजपतर्फे विद्यमान खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर आहेत. त्यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसने बिस्वजित दास यांना, तर काँग्रेसने प्रदीप बिश्वास यांना संधी दिली आहे. बिश्वास यांच्यासाठी ‘माकप’सह डावी आघाडी प्रयत्नशील असल्याचे दिसते.
ठाकूरबाडीचे महत्त्व काय?
बनगाव रेल्वे मार्गावर ठाकूरनगर स्टेशनपासून दीड किलोमीटरवर ठाकूरबाडी आहे. तेथे रिक्षाने १५ मिनिटात पोचता येते. राज्यात आठ ते दहा मतदारसंघांमध्ये मतुआ समाज निर्णायक आहे. मात्र, बनगावमध्ये तो सर्वाधिक प्रभावी आहे. बांगलादेशातून आलेल्या आणि अस्पृश्यांचे जीवन वाट्याला आलेल्या मतुआंनी ठाकूरबाडीत वास्तव्य केले. तेथे हरिचंद ठाकूर यांनी मतुआ समाजाचे संघटन केले. त्यांनी समाजाला आत्मदर्शनाचा मार्ग दाखविला आणि नवी आध्यात्मिक परंपरा रुजविली. त्यामुळे हिंदू प्रवाहात या समाजाचे अनोखे महत्त्व आहे.
मतुआ समाज केंद्रस्थानी
मतुआ समाजाचे हरिचंद ठाकूर यांचे वंशज बनगावच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. बिनापनी देवी या समाजाच्या ‘बोरो माँ’ अर्थात ‘मोठ्या आई’ होत्या. त्यांचे दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील आले होते. तर, तृणमूल सरकारने राज्याचा सर्वोच्च किताब देत मृत्यूपूर्वी त्यांचा गौरव केला होता. त्यांचे थोरले पुत्र कपिल कृष्ण ठाकूर व त्यांच्या पत्नी ममता ठाकूर हे तृणमूलकडून खासदार होते. ‘बोरो माँ’ यांचे धाकटे पुत्र मंजूल कृष्ण ठाकूर यांनी २०१५ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये मंजूल यांचे पुत्र शंतनू खासदार झाले. पुढे २०२१ मध्ये त्यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडली. तेव्हापासून ठाकूरबाडीचा रुबाब अधिकच वाढला आहे. ठाकूरबाडीत येणाऱ्या समाजबांधवांना मतुआ महासंघ ओळखपत्रे देत आहेत.
West Bengal: तृणमूल काँग्रेसचा स्वकियांशीच लढा! उमेदवार नसल्याने भाजपही हतबल
विकासकामे विरुद्ध ‘सीएए’?
‘सीएए’ लागू झाल्यानंतर सर्वाधिक आनंद बनगावमध्ये साजरा करण्यात आला. बांगलादेशातून हुसकावून लावण्यात आलेल्या मतुआसह अन्य नागरिकांना दिलासा मिळाला, असे मंत्री ठाकूर यांनी सांगितले होते. मात्र, भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज करण्याची अट का? खुद्द मंत्री ठाकूर यांनी ‘सीएए’साठी अर्ज केलाय का, असा प्रश्न ‘तृणमूल’चे नेते बबई यांनी केला आहे. बांगलादेश सीमेवर नागरिकांसह मालवाहतूक सुविधेसाठी मोठे टर्मिनल साकारले जात आहे. तो विकासाचाही मुद्दा भाजपने पुढे केला आहे. तर, ‘जुनी मंजूर कामे आता पूर्ण होत आहे. त्यामुळे भाजपने विकासाच्या गप्पा मारू नये, कारण बनगावमधून जाणाऱ्या जेस्सोर राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या दहा वर्षात भाजप रुंदीकरण करू शकलेले नाही’, अशी टीका डावे नेते पीजूष शहा यांनी केली आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.