Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशमध्ये ‘एनडीए’चा डंका; YSR कॉंग्रेसचा मानहानिकारक पराभव, कोणाला किती जागा मिळाल्या?

14

आंध्र प्रदेश : पाच वर्षांपूर्वी प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या वायएसआर काँग्रेसला धक्का देत तेलुगू देसम पक्ष (टीडीपी), जनसेना आणि भाजप या ‘एनडीए’ आघाडीने आंध्र प्रदेशात सत्तांतर घडवले. राज्याच्या १७५ जागांच्या विधानसभेत या आघाडीने दीडशेपार वाटचाल केली.

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’ने १०१ जागा जिंकून ५७ जागांवर आघाडी घेतली. चंद्राबाबू नायडू यांच्या ‘टीडीपी’ने ८५ जागा जिंकल्या, तर ४९ जागांवर आघाडी घेतली होती. जनसेनेला २१ जागा मिळाल्या असून, भाजपने पाच जागा जिंकल्या असून, पक्ष तीन जागांवर आघाडीवर होता. या निवडणुकीत ‘टीडीपी’ने विधानसभेच्या १४४ आणि लोकसभेच्या १७ जागा लढवल्या होत्या. भाजपने लोकसभेच्या सहा आणि विधानसभेच्या १० जागांवर, तर जनसेनेने लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या २१ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले होते.

गेल्या निवडणुकीत म्हणजे २०१९ मध्ये आंध्र प्रदेशात एकहाती विजय मिळवत सत्ता स्थापन केलेल्या जनगमोहन यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाचा यंदा दारूण पराभव झाला. पक्षाने तीन जागा जिंकल्या असून, अन्य नऊ जागांवर पक्ष आघाडीवर होता. जगनमोहन यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांना पक्षात घेऊन गतवैभव प्राप्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या पदरी निराशा आली.

‘एनडीए’च्या विजयात जनसेना प्रमुख पवन कल्याण यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. सन २०१४च्या निवडणुकीच्या तोंडावर स्थापन झालेल्या या पक्षाला त्या निवडणुकीत एकच जागा मिळाली होती. यावेळी त्यांनी २१ जागा मिळवत ‘एनडीए’च्या यशात मोलाचे योगदान दिले आहे.

जगनमोहन रेड्डी पुलिवेंदुला मतदारसंघातून विजयी झाले. मात्र, पक्षाचा मानहानिकारक पराभव झाल्याने हा निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मी अशा निकालाची कल्पनाच केली नव्हती. मात्र, आपला पक्ष जनतेचा आवाज बनून कार्यरत राहील, असे जगनमोहन रेड्डी म्हणाले. निवडणुकीतील विजयाबद्दल जनगमोहन रेड्डी यांनी ‘टीडीपी’ प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि जनसेना नेते पवन कल्याण यांचे अभिनंदन केले.
Lok Sabha Election 2024 Result: आकडे घटले, टेन्शन वाढले; मोदी, शहांचा बड्या नेत्याला फोन, पाठिंब्यासाठी ‘स्पेशल’ ऑफर
जनगमोहन यांची अस्तित्वाची लढाई

जनगमोहन रेड्डी यांनी वडिलांच्या (माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी) निधनानंतर, २०११मध्ये वायएसआर काँग्रेस पक्षाची स्थापना करून २०१४च्या विधानसभा निवडणुकीत नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, २०१४मध्ये सत्ता मिळवण्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्याचा झंझावाती दौरा करून नव्या दमाने लढवलेल्या २०१९च्या निवडणुकीत पक्षाचे १५१ आमदार आणि २२ खासदार निवडून आणले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांना सत्ता राखता आली नाही. यंदाच्या निवडणुकीत पक्षाच्या दारूण पराभवामुळे जगनमोहन रेड्डी यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्हे उभे झाले आहे.

नायडू यांचे पुनरागमन

पाच वर्षांपूर्वी झालेला मानहानिकारक पराभव आणि कौशल्य विकास महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी झालेली अटक, या पार्श्वभूमीवर तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी दमदार पुनरागमन केले आहे. नायडू हे १९९५मध्ये सर्वप्रथम आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर तीन वेळा त्यांना मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळाला. गेल्या निवडणुकीत सत्ता गमावल्यानंतर २०२१मध्ये त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची शपथ घेतली होती. आता ते पुन्हा मुख्यमंत्री बनतील. नायडू हे राज्याप्रमाणेच केंद्रातही चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. राज्यातील सत्तेमुळे ते पुन्हा केंद्रीय पातळीवर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.