तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Delhi Water Crisis: हरियाणाने रोखले दिल्लीचे पाणी; दिल्लीच्या जलमंत्री अतिशी यांचा गंभीर आरोप

0 37

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ‘हरियाणाने हथनीकुंड धरणाचे सर्व दरवाजे बंद केल्यामुळे दिल्लीला त्याच्या वाट्याचे पाणी मिळाले नाही,’ असा आरोप दिल्लीच्या जलमंत्री अतिशी यांनी रविवारी केला. पाणी प्रश्नावरील बेमुदत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यमुना नदीवरील धरणाचे दरवाजे बंद केल्याने दिल्लीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे, असे अतिशी म्हणाल्या. उष्णतेच्या तीव्र झळांमुळे होरपळलेली राजधानी सध्या पाणीटंचाईला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या वाट्याचे पाणी सोडावे या मागणीसाठी अतिशी यांचे उपोषण रविवारी तिसऱ्या दिवशी सुरूच होते. डॉक्टरांनी अतिशी यांना उपोषण सोडण्याचा सल्ला दिल्याचे ‘आप’चे म्हणणे आहे.

‘अनेक पत्रकार शनिवारी हथनीकुंड धरणावर गेले होते. सर्वांनी तेथे फोटो काढले आणि व्हिडिओही बनवले. धरणामध्ये पाणी असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे; परंतु दिल्लीसाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे दरवाजे बंद आहेत,’ असा दावा अतिशी यांनी केला. ‘हथनीकुंड धरणाचे दरवाजे हरियाणाने उघडावेत. दिल्लीकरांना पाणी मिळायला हवे. जोपर्यंत हरियाणा सरकार पाणी देत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील,’ असे त्या म्हणाल्या.

हरियाणा सरकारशी बोलण्याचे आश्वासन

दिल्लीतील पाणी प्रश्नावर ‘आप’च्या शिष्टमंडळाने रविवारी नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेतली. दिल्लीत २८ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी एका आठवड्याचे पाणी दिल्लीला मिळावे, अशी विनंती नायब राज्यपालांकडे केली, असे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी बैठकीनंतर सांगितले. या प्रकरणात हरियाणा सरकारशी बोलण्याचे आश्वासन सक्सेना यांनी दिले आहे, असे ते म्हणाले. १० सदस्यीय शिष्टमंडळात सौरभ भारद्वाज यांच्यासह खासदार संजय सिंह, आमदार सोमनाथ भारती उपस्थित होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.