
Tej Police Times
या दुर्घटनेनंतर उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सरकारी रुग्णालायाबाहेर एकापाठोपाठ एक रुग्णवाहिकेमधून मृतदेह आणले जात होते. हे मृतदेह रुग्णालयाबाहेरच जमिनीवर ठेवले होते. तेथे मृतदेहांचा खच पडला होता. मृतदेह पाहून त्यांच्या नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. हे नातेवाइक अश्रू पुसत होते आणि एकमेकांचे सांत्वन करत होते. जखमींवर उपचार करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती, त्याच वेळी मृतांच्या नातेवाइकांनी टाहो फोडला होता. मन हेलावून टाकणारे चित्र रुग्णालयाबाहेर दिसले.
Hathras Stampede: सूट-बूट-टाय घालून भोले बाबाचे सत्संग, मजबूत राजकीय कनेक्शन; दरबारात अखिलेश यादवांची हजेरी
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत किंवा बेशुद्ध झालेल्यांना ‘सिकंदरा राव ट्रॉमा सेंटर’ येथे रुग्णवाहिका, ट्रक आणि कारमधून आणण्यात येत होते. एका ट्रकमध्ये एक महिला पाच-सहा मृतदेहांमध्ये रडत बसली होती आणि लोकांना आपल्या मुलीचा मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याची विनंती करत होती.
एकाच कुटुंबातील दोघांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या वाहनांत होते. त्यांचे कुटुंबीय तेथील डॉक्टरांना मृतदेह बाहेर काढण्याची विनंती करीत होते. अनेक जखमी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर बसले होते. त्यांच्यावर उपचारांसाठी आवश्यक डॉक्टर, नर्स तेथे उपलब्ध नव्हत्या. स्थानिकांनी या दुर्घटनेसाठी प्रशासनाच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरले आहे.
Hathras Stampede : दुर्घटनेसाठी सरकार जबाबदार विरोधकांची टीका, तर पीएम मोदींचा योगींना फोन
संध्याकाळनंतर मृतांचा आकडा वाढू लागला आणि रुग्णालयाबाहेरील गर्दीही वाढू लागली. ‘१०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून रुग्णालयात एकच डॉक्टर होता. ऑक्सिजनची सोय नव्हती. काही जण अजूनही श्वास घेत आहेत; पण उपचारांची योग्य सोय नाही,’ असे संतप्त तरुणाने रुग्णालयाबाहेर माध्यमांशी बोलताना सांगितले.
प्रत्यक्षदर्शी शकुंतला देवी यांनी ‘पीटीआय’ला सांगितले, सत्संग संपल्यानंतर लोक कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडत असताना चेंगराचेंगरी झाली. बाहेर नाल्यावर उंचीवर रस्ता तयार करण्यात आला होता. येथे लोक एकमेकांच्या अंगावर पडले.’ आणखी एक प्रत्यक्षदर्शी सोनू कुमार म्हणाले, ‘या ठिकाणी पाच ते दहा हजार जण उपस्थित होते. भोलेबाबा जसे निघाले, तसे त्यांचा पदस्पर्श करण्यासाठी एकच झुंबड उडाली. जवळच्या नाल्यातून पाणी वाहत आले होते. त्यामुळे जमिनीचा काही भाग खचल्याने लोक घसरून एकमेकांवर कोसळले.’
कार्यक्रम संपण्यापूर्वी कार्यक्रमस्थळावरून निघालेल्या आणखी एका व्यक्तीने सांगितले, ‘जमलेल्या गर्दीसाठी तेथे कोणतीही व्यवस्था नव्हती. एकूण तेथे सर्वत्र विस्कळितपणा होता.’ सिकंदरा राऊचे उपविभागीय दंडाधिकारी रवेंद्र कुमार म्हणाले, ‘धार्मिक गुरूंच्या दर्शनासाठी एकाच वेळी उसळलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा नव्हती.’
Recover your password.
A password will be e-mailed to you.