
Tej Police Times
इ.स.१८९३ च्या आधी गणेशोत्सव फक्त घरगुती होते. काही दिवसांपुरता हा सण असायचा. प्रामुख्याने कुटुंबात खाजगीरित्या साजरा केला जात असे. तसं पाहिलं तर विशेषत: ब्राह्मण आणि उच्चवर्णीयांच्या घरात गणोशोत्सव साजरा होत होता, पण १८९३ मध्ये असे काही घडले की गणेशोत्सव एकदम भव्य दिव्य झाला त्याला सार्वजनिक रूप मिळाले आणि मंडपात गणराया विराजमाने होवू लागले. नक्की काय झाले असेल…चला वाचूया…
टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले होते. लोकमान्य किंवा लोकनेते ही पदवी देखील टिळकांना बहाल करण्यात आली आहे. त्यांनी परखडपणे ब्रिटीशांविरोधात मते मांडली. ते स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. भारतातील ब्रिटीश राजवटीच्या ढोंगी आणि शोषणाविषयी त्यांनी उघडपणे आवाज उठवला. त्यांना लोकांना जास्ती जास्त सहभाग स्वातंत्र्याच्या चळवळीत हवा होता पण सगळे लोक एकत्र येणार कसे हा प्रश्न होता आणि अखेर त्यांना त्याचे उत्तर सापडले.
लोकांची एकजूट झाली तर ब्रिटीशांच्या जोखडातून भारत देश लवकरच स्वतंत्र होईल असे त्यांना नेहमी वाटत असे. ब्रिटीशांच्या विरोधातील धार अधिक तीव्र करण्यासाठी त्यांनी सण उत्सवांचा आधार घ्यायचे ठरवेल कारण सण उत्सव असला की लोकं एकत्र येणारच, म्हणूनच राजकीय जनजागृतीसाठी इ.स. १८९३ साली टिळकांनी घरगुती गणेशोत्सव हा सार्वजनिक रित्या सुरू केला. मुंबईमधील गिरगाव येथील केशवजी नाईक चाळीत लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. तेथिल गणेशोत्सव पर्यावरण पुरक स्वरुपातील असून आजही तिथे गणपतीचे पावित्र्य आणि लोकमान्य टीळकांच्या विचारांना स्मरून गणेशोत्सव मांगल्यपूर्ण पद्धतीत साजरा केला जातो. गणेशोत्सव या सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हेच टिळकांचे उद्दिष्ट होते.
१८५७ मध्ये ब्रिटिश राजवट उलथून टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर भारतीय लष्कराच्या सैनिकांनी इंग्रजांचा पाडाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इंग्रजांनी सैनिकांचे बंड क्रूरपणे चिरडून टाकले. तरीही एका प्रमुख भारतीय जहालवादी नेत्याला फक्त स्वराज्य किंवा स्वराज्य हवे होते. तो नेता म्हणजे मराठी पत्रकार, शिक्षक आणि राजकीय व सामाजिक कार्यकर्ते बाळ गंगाधर टिळक (१८५६-१९२०) “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात. त्यांनी आगरकरांसोबत केसरी आणि मराठा वर्तमानपत्र सुरु केलं. त्यातून वारंवार ब्रिटीशांविरोधात ताशेरे ओढले.
१८९३ मध्ये लोकमान्य बाळगंगाधर टीळक यांच्यामुळे घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप आले. हिंदू धर्मात गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात. तो प्रत्येक कार्यातील विघ्न दूर करतो. सार्वजनिक गणेशोत्सवात देशभक्तीपर गीते गायली गेली आणि राष्ट्रवादी विचारांचा प्रचार केला गेला. टिळकांनी आपल्या लिखाणातून, ज्वलंत भाषणातून आणि संघटनात्मक ज्ञानातून गणेशोत्सव सार्वजनिक रूपात आणण्याचा प्रयत्न केला. ‘Lokmanya Tilak: Father of the Indian Freedom Struggle’ हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित पुस्तकात लेखक धनंजय कीर यांनी लिहिलेले आहे. त्यात सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल असे सांगितले आहे की, ‘जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव टीळकांनी सुरु केला, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव समित्यांची स्थापना करण्यात आली. तरुणांनी गायकांचे गट तयार केले. गणपती समोर लोकांना स्वातंत्र्याचे धडे देण्यात आले.उत्सवाच्या माध्यमातून लोकांच्या मनात स्वातंत्र्याबद्दल स्वाभिमान निर्माण करण्यात आला. गणेशोत्सवाद्वारे टीळकांनी समाजप्रबोधन करायला सुरुवात केली. तरुणांना आत्मत्यागाचे आणि शौर्याचे धडे दिले आणि लोकांमध्ये स्वातंत्र्याची उर्मी जागृत केली.’ त्याचवर्षी कापसावर ब्रिटिशांनी कर लादल्यामुळे टिळकांनी विदेशी कापडावर बहिष्कार घालण्यासाठी महाराष्ट्रात मोहिम सुरू केली. टिळकांच्या आंदोलनाने ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते.
आता लवकरच गणेशोत्सव येईल. आज आपण ज्या गणेशोत्सवाचे साक्षीदार आहोत खास करून महाराष्ट्रात ते अत्यंत विशाल असे गणेशोत्सवाचे रूप आहे. कदाचीत हा टिळकांच्या कल्पने पलीकडेही मोठा असेल. गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवात खूप बदल झाले. राजकीय नेत्यांचा सहभाग, व्यावसायिकता अशा अनेक गोष्टी पहायला मिळाल्या आणि मिळत आहेत. तरी सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र आणणारा हाच होता आणि सदैव राहील.
लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.