तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Akola News : पुराच्या पाण्यातून काढावी लागते वाट; निर्गुणा नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांची शाळेसाठी कसरत

0 34

नीरज आवंडेकर, अकोला : पातुर तालुक्यातील आलेगाव व गोळेगावला जोडणाऱ्या रस्त्यावरील निर्गुणा नदीवर पूल नसल्यामुळे गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गोळेगाव येथील विद्यार्थ्यांना चौथीच्या पुढील शिक्षणासाठी आलेगाव येथे जावे लागते. पावसाळ्यात पाठीवर दप्तर घेऊन पुरातून मार्ग काढत शाळा गाठावी लागत आहे. अतिदुर्गम भागातील हे गाव अद्यापही विकासापासून कोसो दूर आहे.

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील आलेगाव गटग्रामपंचायतमधील गोळेगावात विकास पोहोचला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. मागील अनेक वर्षापासून गावकऱ्यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या गावात राहणारा नाथजोगी समाज सोयी-सुविधांपासून वंचित आहे. सदर समाजाचे पाच ते सहा घरे ई-क्लासच्या जागेमध्ये १९८१ मध्ये स्थायिक झाले. आज या समाजाची जवळपास १३५ कुटुंबे निवास करून राहतात. या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी ३० वर्षांपूर्वी जवाहर योजनेतून एक विहीर बांधली. सदर विहीरीचे पाणी दूषित आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नळयोजनेतून केलेली असली तरी अनेकवेळा विद्युत पुरवठा बंद असल्याने विहिरीचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. तसेच त्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी निर्गुणा नदी पात्रातून रस्ता काढत शाळा गाठावी लागते. विद्यार्थ्यांसाठी बस गावात जात नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये पुराच्या पाण्यातून तसेच रस्त्यावरील चिखल तुडवित तीन किमी अंतर पायी चालून शाळेत जावे लागत आहे. दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या लोकांची ही वस्ती जंगली भागात असल्यामुळे वन्यप्राण्यांची भीती असते. उपचाराकरिता तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता आलेगावशिवाय पर्याय नाही.
कडक सॅल्यूट! वायनाडच्या मदतीला नगरच्या कन्येचे हात; मेजर सीता शेळके यांच्या पथकाने उभारला ३१ तासांत पूल
बस नसल्याने तीन किमी पायपीट

आलेगाव येथे दहावीचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी यश राहुल मोहाडे म्हणाला, शाळेत जायचे असेल तर तीन किलोमीटर पायी प्रवास करून जावे लागते. शासनाने आम्हा विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही बसची व्यवस्था केलेली नाही. पूल नसल्याने आमचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. तर गोळेगावात केवळ चौथीपर्यंत शिक्षण आहे. पुढील शिक्षणासाठी आलेगावला जावे लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पुरातून मार्ग काढावा लागत आहे. नदीवर पूल झाल्यास आमची समस्या सुटू शकते. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, असे गौरी भगत शिंदे ही विद्यार्थिनी म्हणाली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.