
Tej Police Times
तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख
पुणे : पूर्ववैमनस्यातून झालेल्या खूनाचा बदला घेण्यासाठी चौघांनी दुचाकी, रिक्षाची तोडफोड करून दहशत पसरविण्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री 1 वाजता येरवड्यातील जयप्रकाशनगरमध्ये घडला. ‘आमचा भाई गेला आता, जो कोणी मध्ये येईल, त्याला आम्ही संपवून टाकणार,’ असे म्हणत हातातील धारदार हत्यारे हवेत फिरवून आरोपींनी दहशत पसरवली. त्यानंतर एका तरुणावर धारदार कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी प्रविण भगवान कांबळे (वय ३६, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सुधीर चंद्रकांत ऊर्फ बाळू गवस (वय २५, रा. जयप्रकाश नगर, येरवडा) याचा तिघांनी १७ जुलैला पहाटे अडीच वाजता खून केला होता. त्यामुळे त्याचे साथीदार बदला घेण्याच्या तयारीत होते. दरम्यान, फिर्यादी प्रवीण कांबळे हे माऊली चौक ते महिंद्रा सोसायटी दरम्यान शतपावली करत होते. त्यावेळी चौघे गुंड सुधीर गवसच्या खूनाचा बदला घेण्यासाठी हातामध्ये कोयता घेऊन आले. त्यांनी परिसरातील दुचाकी, रिक्षाची तोडफोड करून नुकसान केले. ‘आमचा भाई गेला, आता जो कोणी मध्ये येईल त्याला आम्ही संपवून टाकणार,’ असे ओरडून हत्यारे हवेत फिरवून दहशत पसरवली. प्रवीणला जीवे मारण्यासाठी वार करून त्यांना गंभीर जखमी केले. येरवडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोळुंके तपास करीत आहेत.

Recover your password.
A password will be e-mailed to you.