
Tej Police Times
पौराणिक कथेनुसार, भीमा नावाचा एक महाबलाढ्य राक्षस होता. तो कर्कटी राक्षसीच्या पोटी कुंभकर्णापासून उत्पन्न झाला होता. विवाहानंतर कुंभकर्ण लंकेत आला पण कर्कटी पर्वतावर राहिली. पुढे प्रभूराम यांनी कुंभकर्णासह रावणाचा वध केला. कर्कटीने आपल्या पुत्राला देवांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पण भीमा मोठा झाल्यावर त्याला आपल्या पित्याबद्दल आणि त्याची हत्या करणाऱ्या प्रभूरामाबद्दल माहिती समजली.
वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचे त्याने ठरवले. जंगलात भीमाने कठोर तपस्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याला अतुल्य सामर्थ्याचे वरदान दिले. त्याने इंद्रदेवांचा पराभव केला. सगळीकडे हाहाकार माजवला. त्यानंतर भीमाने कामरुपेश्वर राजावर आक्रमण करुन त्याला बंदिवासात टाकलं. कामरुपेश्वर राजा शिवभक्त होता. त्याने कारागृहात राहून शंभोशंकराचे नामस्मरण सुरु ठेवले.
शिवआराधनेत कोणताही खंड पडू दिला नाही. त्याने एक पार्थिव लिंग बनवले, गंगेची स्तुती करून त्याला स्नान घालने वगैरे उपचार तो मनानेच अर्पण करू लागला. पूजनानंतर तो शिवप्रभूंचे ध्यान करायचा. अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती करायचा.
ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. अशा प्रकारे त्याचा सर्व वेळ शिव आराधना करीत व्यतीत व्हायचा. त्याची साध्वी पत्नी दक्षिणा ही सुद्धा आपला पती सुखरूप रहावा आणि कुशल परत यावा या उद्देशाने पार्थिव लिंगाची प्रेमपूर्वक पूजा करत होती. अशाप्रकारे ते दांपत्य संकट काळातही एकनिष्ठेने शिवसेवेत तत्पर राहिले.
इकडे भीमाचा आक्रमकपणा दिवसेंदिवस वाढत होता. देवतांनी शंभोमहादेवाची प्रार्थना केली तेव्हा त्यांनी देवतांना आश्वासन दिले लवकरच भीमाचा नाश होईल. कामरुपेश्वराच्या आराधनेवर शंभोशंकर प्रसन्न होते ते गुप्त रुपाने त्याच्या आसपास उपस्थित राहिले.
एकदा भीमाला कामरुपेश्वराच्या शिवभक्तीबद्दल समजले. तो तडक कारागृहात आला. कामरुपेश्वर म्हणाले, ‘प्राण गेला तरी शिवभक्ती मी सोडणार नाही.’ भीमा क्रोधीत झाला आणि त्याने पार्थिव शिवलिंग भंग करण्यासाठी तलवार बाहेर काढली. तो शिवलिंगावर तलवार चालवणार एवढ्यात तिथे शंभोमहादेव प्रकट झाले. भीमा आणि शंभोशंकर यांच्यात भीषण युद्ध झाले. या युद्धात भीमा भस्म झाला.
सर्व देवतांनी शंभूमहादेवाचे आभार मानले. इंद्रादी देवांसह सर्व ऋषींना मोठे समाधान वाटते. तेव्हा देवांनी व मुनींनी शिवजींची विशेष प्रार्थना केली. ते म्हणाले, “प्रभो, तुम्ही सर्वांचे हित करणारे आहात. म्हणून जगाच्या कल्याणासाठी येथेच निवास करा.
तुम्ही येथे राहिलात तर तुमच्या दर्शनाने लोकांचे कल्याण होईल. तुम्ही भीमाशंकर नावाने प्रसिद्ध व्हाल.” तेव्हा सर्वांच्या विनंतीला मान देऊन भगवान शंकरांनी तेथे वास्तव्य केले. तेच हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग होय.
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.