
Tej Police Times
चौदाव्या शतकात खूप मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळाला ‘दुगर्गादिवीचा दुष्काळ’ असे म्हणतात. या दुष्काळामुळे लोकांचे अतोनात हाल झाले. प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, सगळीकडे उपासमारीमुळे लोकांचा जीव जात होता. प्राण्यांचे देखील तेच हाल होते. त्यावेळी एका शिवभक्ताने आपली सारी संपत्ती आणि धान्याची कोठारे जनतेसाठी खुली केली. कोण होती ती व्यक्ती? त्यांच्या दानशुरतेची आठवण म्हणून श्रियाळ षष्ठी साजरी केली जाते.
नागपंचमीचा दुसरा दिवस हा श्रियाळ षष्ठी म्हणून ओळखला जातो. अनेकजणांना प्रश्न पडला असेल श्रियाळ कोण आहेत. श्रियाळ श्रेष्ठ हे शिवभक्त होते. व्यवसायाने ते वाणी होते. अतिशय उदार मनाचे सर्व प्राणीमात्रांवर दया करणारे. त्यांच्या हितासाठी धडपडणारे आणि दान धर्म करणारे. श्रियाळ श्रेष्ठ यांचे कार्य चालू असताना दुष्काळ पडला. हा दुष्काळ चक्क १२ वर्षे राहिला. चौदाव्या शतकात पडलेल्या या दुष्काळाला ‘दुगर्गादिवीचा दुष्काळ’ असे म्हणतात. इतके वर्षे हा दुष्काळ राहिल्याने लोकांचे फार हाल झाले. प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही. लोकांची उपासमार होऊ लागली. श्रियाळ श्रेष्ठ यांनी हे पाहिले आणि त्यांना फार वाईट वाटले. त्याने लोकांना मदत करायचे ठरविले. त्याने महाराष्ट्र आणि गुजरात प्रांतांत हजारो बैल फिरते ठेवले आणि सर्व लोकांना धान्याचा पुरवठा केला. त्याच्या दानशूरतेची खूप प्रशंसा झाली. त्याच्या रूपाने लोकांना परमेश्वरच भेटला.
आदिलशाहने त्याला बोलावून घेतले. त्याचे खूप कौतुक केले आणि बादशहा म्हणाला, “शेटजी, तुला काय हवं ते माग, मी देतो.” श्रियाळ श्रेष्ठ यांना क्षणभर विचार केला आणि बादशहाला म्हणाले, “द्यायचेच असेल, तर फक्त साडेतीन घटका मला तुमचे राज्य द्या.” बादशहा आपल्या शब्दाचा पक्का होता त्याने श्रियाळ श्रेष्ठ यांची मागणी मान्य केली. राज्य मिळताच श्रियाळ श्रेष्ठ यांनी पूर्वीच्या बादशहाने जी जी धर्मसंस्थाने, देवस्थाने खालसा केली होती, ती मुक्त केली, काही देवस्थानांना इनाम दिला, नेमणुका करून दिल्या आणि स्वतःसाठी काहीही न घेता साडेतीन घटकांचे मिळालेले राज्य बादशहाला परत केले. हे पाहून बादशहाहै आश्चर्यचकित झाला. असे सांगितले जाते, श्रियाळ श्रेष्ठ यांनी साडेतीन घटकामध्ये खूप काही बदल केले. जनतेच्या हिताची कामे केली आणि यामुळे त्यांना एवढा हर्षानंद झाला की त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तो दिवस श्रावण षष्ठीचा होता. दानशूर श्रियाळ श्रेष्ठ यांची आठवण सगळ्यांना रहावी म्हणून श्रीयाळ षष्ठी साजरी केली जाते.
श्रियाळ श्रेष्ठ यांना ग्रामीण भाषेत सक्रोबा तर काहीजण शिराळ शेठ यानावाने देखील ओळखतात. श्रीक्षेत्र जेजुरी येथील जेजुरीगडावरील मंदिरात आणि कडेपठार मंदिरात सक्रोबाचे पूजन केले जाते. श्रावण महिन्यात व्रत वैकल्य केली जातात, दानधर्म केले जातात. यंदाच्या श्रीयाळ षष्ठीला म्हणजे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हीसुद्धा एखाद्या गरजवंताची मदत करा किंवा तुम्हाला जसे जमेल तसे दान करा. हीच खरी श्रियाळ श्रेष्ठ यांच्या नावाने केलेली पूजा असेल.
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.