Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लाडकी बहिण योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका

9

प्रसाद रानडे, रत्नागिरी : राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. परंतु विरोधकांकडून या योजनेवर सातत्याने मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. याच टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विरोधकांचे चेहरे काळे ठिक्कर पडले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ” विरोधकांनाही वाटलं होतं की पंधराशे रुपयांची घोषणा केली पण पैसे जमा होणार नाहीत परंतु पैसे जसे खात्यात जमा होत गेले तसे विरोधकांचे चेहरे काळे ठिक्कर पडले. ‘बुरी नजर वाले तेरा मुह काला’ अशा प्रकारची विरोधकांची अवस्था झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार आम्ही चर्चा करून हा निर्णय घेतला. परिस्थिती बदलत जाईल तशी यामध्ये पंधराशे रुपये नाहीतर दोन हजार, अडीच हजार , तीन हजार, याहीपेक्षा देण्याची दानत तुमच्या या सगळ्या भावांमध्ये आहे”. असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. या योजनेसाठी 33 हजार कोटींची तरतूद केल्याचीही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रचार प्रसार मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून त्याचे दोन हप्ते रक्षाबंधनापूर्वी बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. ज्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकले नसतील त्यांनीही ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरल्यास जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीनही महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील. ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असून कोणी माईचा लाल आला तरीही ही योजना बंद करू शकणार नाही असं शिंदे म्हणाले आहेत.

बदलापूरमधील घटना अतिशय निंदनीय

बदलापूर घटनेचा एकनाथ शिंदे यांनी उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, ”बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराची घटना हि अतिशय निंदनीय असून त्या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. अशा प्रकरणात सरकार गंभीर असून आरोपीला फाशी व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. या घटनेतील आरोपीला अटक केली असून संस्था चालकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. तसेच दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून आरोपीवरील खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येणार आहे”. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.

आंदोलन राजकीय हेतुने प्रेरित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, ”बदलापूरात झालेले आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित होते. बाहेरून लोकं आणून नऊ तास रेल रोको करण्यात आला. अशा घटनेचे राजकारण करणे गैर होते मात्र विरोधकांना त्याचा विसर पडला. या योजनेची लोकप्रियता वाढल्याने त्याबद्दलचे बोर्ड या आंदोलनात नाचवण्यात आले. शासन महिलांना सुरक्षा देण्यासाठी सक्षम असून महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल” असं एकनाथ शिंदे म्हणाले

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.