
Tej Police Times
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना ही दुर्दैवी आहे. आपले पालकमंत्री आणि नौदलाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत आहेत. उद्या नौदलाचे अधिकारी आणि आमचे अधिकारी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम पुन्हा करतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटांचा भव्य पुतळा मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. पण हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला आहे. यासंदर्भातील प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. हा पुतळा नौदलाने उभारला होता. त्यासंदर्भातील संपूर्ण डिझाईन नौदलाने तयार केले होते. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितले की, ताशी ४५ किमी वेगाचा वारा होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याने नुकसान झाले आहे. उद्या तिथे नेवीचे अधिकारी येणार आहेत. आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी गेले आहेत. मी त्यांना सूचना केलेल्या आहेत. उद्या तात्काळ नेवीचे अधिकारी आणि आमचे अधिकारी हे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचं पुन्हा काम करतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान; स्मारक कोसळण्याच्या घटनेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, उद्घाटनाचा मला “शॉकच” होता
आमदार वैभव नाईक यांनी या घटनेनंतर मालवणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. याबाबत एकनाथ शिंदे यांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, ठीक आहे. शेवटी भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. पण कायदा हातात घ्यायची आवश्यकता नाही. कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे. कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राहिली पाहीजे यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
या पुतळ्याचे उद्घाटन ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुतळ्याचे काम करणाऱ्या ठाण्यातील कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.