तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Jaydeep Apte : आरोपी जयदीप आपटेला न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

0 157

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 5 Sept 2024, 6:40 pm

chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : आरोपी जयदीप आपटे व तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना आज सिंधुदुर्ग न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी केली असून दोन्ही आरोपींना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सिंधुदुर्ग : राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे व तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना आज सिंधुदुर्ग न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी केली असून दोन्ही आरोपींना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील या दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तांत्रिक सल्लागार डॉ. पाटील यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तर जयदीप आपटे हा फरार झाला होता.

जयदीपला कल्याणमधून अटक

जयदीप विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लूक आउट नोटीसही जारी केली होती. अशातच बुधवारी रात्री मुख्य आरोपी जयदीप आपटे याला कल्याण येथून त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. आज सकाळी त्याला मालवण पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. त्यांनंतर दुपारी या दोन्ही संशयित आरोपींना सिंधुदुर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्ष व संशयित आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी या दोन्ही संशयित आरोपींना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विधानसभेच्या तोंडावर मिऱ्या एमआयडीसी वादाच्या फेऱ्यात, अधिसूचनेवरुन शिवसेना भाजप आमने-सामने

पुतळा दुर्घटनेवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते सांगलीतील भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ”काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले आणि माफी मागून गेले. आपल्या हातून चूक होते, तेव्हाच माफी मागितली जाते. म्हणजे मोदींना चूक झाल्याचं मान्य आहे का?, असा सवाल काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विचारला. मोदींनी माफी नेमकी कशाबद्दल मागितली? संघाच्या माणसाला अनुभव नसतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम दिलं त्याबद्दल मोदींनी माफी मागितली की पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला, त्याबद्दल मोदींनी क्षमा मागितली, असे प्रश्न राहुल यांनी सांगलीतील सभेत विचारले आहेत.

अजित भाबड

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.