
Tej Police Times
प्राचीन भारतीय परंपरेनुसार हिंदू धर्मातील सर्व जातीत गोत्र आढळते. सर्वात आधी एखाद्या ऋषीच्या नावावरून याचे नामकरण करण्यात आले. काही गोत्रांची नावे कुलदेवीच्या नावानेही प्रसिद्ध झाली. सामान्यपणे गोत्र म्हणजे कूळ किंवा वंश परंपरा होय. संस्कृत व्याकरणाचे जनक महर्षी पाणिनी यांच्या अष्टाध्यायात एक सूत्र आहे ‘अपात्यं पौत्रप्रभृति गोत्रम्’ म्हणजेच गोत्र शब्दाचा अर्थ आहे मुलाच्या मुलापासून सुरू होणारे…. गोत्र म्हणजे आपला जन्मवंश शास्त्रीय दृष्टीकोनातून अत्यंत सुक्ष्मपणे सांगणारी मानवशाखा आहे.
“धर्मसिंधु” ग्रंथामध्ये गोत्राबद्दल पुढीलप्रमाणे सांगितले आहे, “तत्र गोत्र लक्षणम् – विश्वामित्रो जमदग्निर्भरद्वाजोऽथ गौतमः । अत्रिर्वसिष्ठः कश्यप इत्येते सप्तऋष्यः ॥”
अर्थात विश्वामित्र, जमदग्नि, भारद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ आणि कश्यप हे सात ऋषी आहेत आणि आठवे ऋषी अगस्त्य हे होते. यापैकी प्रत्येक ऋषीचे अपत्य म्हणजे गोत्र होय. गोत्रासंदर्भात माहिती शोधताना असेही सापडले की महाभारतातील शांतीपर्वात एका श्लोकानुसार त्यावेळी मूळ रुपात प्रमुख चार गोत्र होते – अंगिरा, कश्यप, वशिष्ठ आणि भृगु. पण कालांतराने जमदग्नि, अत्रि, विश्वामित्र आणि अगस्ती ऋषींची नावे जोडली गेल्याने त्यांची संख्या आठ झाली. गोत्रांची संख्या अगणित असली तरी धर्माने त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी पन्नास गणामध्ये केलेली आहे. त्या त्या ऋषींच्या नावांना गोत्र असे म्हणतात. ब्राह्मणांमध्ये जेव्हा कोणाला आपल्या गोत्राची माहिती नसेल तर ते ‘कश्यप’ गोत्राचे उच्चार करतात. कारण कश्यप ऋषींचे एकापेक्षा जास्त लग्न झाली आणि त्यांना बरीच अपत्ये होती. अनेक अपत्य असल्यामुळे असे ब्राह्मण ज्यांना आपल्या गोत्राची माहिती नसते ‘कश्यप’ ऋषींच्या ऋषिकुळाशी निगडीत आहेत असे मानले जाते.
व्यावहारिक स्वरूपात ‘गोत्र’ म्हणजे ओळख ! जी ब्राह्मणांसाठी त्यांच्या ऋषिकुळांनी सांगितली होती. तसे पाहिले तर ‘गोत्रा’चा शाब्दिक अर्थ खूप विस्तृत आहे. विद्वानांनी वेळोवेळी याचा योग्य प्रकारे अर्थ लावला आहे. ‘गो’ म्हणजे इंद्रिय आणि ‘त्र’ म्हणजे ‘संरक्षण करणे’, म्हणून गोत्राचा एक अर्थ इंद्रिय आघातांपासून संरक्षण देणारे देखील आहे. कालांतराने वर्ण व्यवस्थेने जाती व्यवस्थेचे रूप घेतल्यावरही ओळख स्थान आणि कर्माशी संबंधित झाली. हेच कारण आहे ब्राह्मणाच्या व्यतिरिक्त इतर वर्गाचे गोत्र बहुतेक त्यांचे उगम स्थान किंवा कर्मक्षेत्राशी निगडित असतात. ‘गोत्र’ याचा मुख्य उद्देश एकत्रिकरणाचा आहे परंतु सध्याच्या काळात कर्मकांडापुरतेच याचे महत्त्व राहिले आहे, असे म्हणायला हवे. प्रत्येक गोत्रांना प्रर्वतक ऋषी असतात. काही गोत्रांना एक, काही गोत्रांना दोन, काही गोत्रांना तीन ते पाचपर्यंत प्रवर्तक असतात. या प्रवर्तक ऋषी गणांना प्रवर असे म्हणतात.
आपल्याकडे गोत्र समान असल्यास विवाह करू नये असे म्हणतात कारण हिंदू धर्मात एकच गोत्र असल्याने ते एकमेकांचे भाऊ-बहीण असू शकतात, पती पत्नी नव्हे, असे म्हटले जाते. एकाच गोत्रात विवाह झाला तर त्या दांपत्यापासून जन्माला येणारी पुढच्या पिढीत व्यंग असण्याची शक्यता असते. काहीजण म्हणतात, सात पिढ्यांनतर गोत्र बदलते. म्हणजेच सात पिढ्यांमध्ये एकच गोत्र असेल तर आठव्या पिढीत त्याच गोत्रातील व्यक्तीशी विवाह करण्याचा विचार केला जाऊ शकतो. यावर अनेक मतमतांतरे आहेत.
आपल्या समाजात आजही पितृवंशीय गोत्रच प्रचलित आहे. गोत्र एखाद्या आदिपुरुषाचेच असायला हवे असं नाही. आपल्या समाजात अनेक जातीजमातींमध्ये विशिष्ट चिन्हांनीही गोत्र ठरवले जाते जे वनस्पतींपासून ते पशु-पक्षी असेही असू शकते. सिंह, मकर, सूर्य, मासा, पिंपळ, बाभळीचे झाड यांचा यात समावेश आहे. ही परंपरा आपल्याला आर्य समाजात पहायला मिळते. आजच्या समाजात सर्वांनाच आपले गोत्र साधारणपणे माहिती असते. पण असंही होऊ शकतं की, एखाद्याला आपले गोत्र माहिती नसते. अशावेळी त्याने आपले गोत्र कश्यप मानावे.
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.… आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.