तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

सर्वसामान्यांना मोठा दिलासा; भाजीपाल्याचे भाव इतक्या रुपयांनी घसरले

0 50

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबईः थंडीचा हंगाम सुरू झाल्याने भाजीपाल्याला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुसार आता सर्वच ठिकाणी भाजीपाल्याचे चांगले उत्पादन व्हायला सुरुवात झाली आहे. परिणामी घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक वाढायला सुरुवात झाली आहे. परराज्यांतूनही भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव घसरले आहेत. घाऊक बाजारात सर्वसाधारण भाज्या ३० ते ४० रुपये किलोच्या घरात आल्या आहेत; तर कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, भोपळा या भाज्या ७ ते ८ रु. किलो दराने विकल्या जात आहेत.

मटारचा भावही २० रुपये किलोवर घसरला आहे. सध्या मुंबई घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. पाचशे ते साडेपाचशे गाड्यांवर असलेली आवक आता साडेसहाशे गाड्यांवर पोहोचली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजारात येत असल्याने बाजारात आता सर्वत्र भाजीपाल्याच्या राशी पाहायला मिळत आहेत. आवक वाढली असली तरी सध्या मागणीत काही प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक मुंबईकर बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे इथल्या दैनंदिन मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे. आवक जास्त आणि मागणी कमी असे समीकरण झाल्याने बाजारात भाज्यांच्या भावामध्ये मोठी घसरण झाल्याचे बाजार समितीच्या बाजारभावानुसार स्पष्ट होत

आहे. घाऊक बाजारात कोबी, फ्लॉवर, भोपळा आणि टोमॅटोचा भाव ७ ते ८ रु. किलो झाला आहे. फ्लॉवर, कोबीच्या दररोज २४ ते २५, भोपळ्याच्या १० ते १५ गाड्या येत आहेत. टोमॅटोच्या ४५ ते ५० गाड्यांची आवक दररोज आहे. मटारच्या तर ७० ते ८० गाड्या येत आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात त्यांचा भाव २० रु. किलो झाला आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याने भाव खालीच राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.