
Tej Police Times
२८ फेब्रुवारी १९२८ रोजी नोबेल पारितोषिक विजेते – भारतरत्न सर सी. व्ही. रामन यांनी ‘रामन इफेक्ट’ हा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध जगासमोर सादर केला होता. त्या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. जगाला एक ‘नवा प्रकाश’ देणारा हा रामन इफेक्ट काय होता आणि या संशोधनासाठी डॉ. रामन यांनी काय मेहनत घेतली, किती खर्च आला होता… पाहू.
रामन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला होता. अत्यंत तल्लख बुद्धीच्या – रामन यांनी वयाच्या ११व्या वषीर्च शालेय शिक्षण संपवले! १५व्या वर्षी ते इंग्रजी आणि विज्ञानामध्ये पदवीधर झाले तर १७व्या वर्षीच फिजिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षणही उच्च श्रेणीमध्ये पूर्ण केले.
कोलकाता येथे रामन डेप्युटी अकाउंटंट जनरल पदावर रुजू झाले, पण या रुक्ष नोकरीमध्ये त्यांचे मन रमेना, म्हणून कोलकाता येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून – कमी पगारात – नोकरीत रुजू झाले. ते अकाउंटंट म्हणूनच नोकरी करत राहिले असते तर भारतासह जग एका महान शास्त्रज्ञाला मुकलं असतं!!
१९२१मध्ये कलकत्ता विद्यापीठातर्फे त्यांना ब्रिटनला उच्च शिक्षणासाठी पाठवण्यात आले. यावेळी त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये ‘भारतीय तंतूवाद्ये’ हा शोधनिबंध सादर केला. पुढे १९३५मध्ये ‘भारतीय चर्मवाद्ये’ विशेष करून तबल्याच्या नादनिमिर्ती, तबल्याची पुडी, शाई, तरंगलांबी इत्यादींवर संशोधन केले.
युरोपातून समुद्रमार्गे भारतात परत येत असताना आकाशातील निळ्या रंगाने त्यांचे कुतूहल जागृत झाले. आकाश निळ्या रंगाचे का दिसते? अशा प्रश्नामधून त्यांचे संशोधन सुरू झाले. व त्यामधूनच त्यांनी भारतात परत आल्यावर – पाणी, बर्फ यांमधून प्रकाशाचे विकिरण (स्कॅटरिंग) यावर संशोधन सुरू केले. व यातूनच त्यांना आकाशाच्या निळ्या रंगाची उत्तरे मिळाली! यासंदर्भातले पुढील संशोधन ‘रामन इफेक्ट’ म्हणून जगासमोर आले.
लेसर किरणांच्या क्रांतिकारी शोधानंतर रामन इफेक्ट – हे शास्त्रज्ञांच्या हातातील एक महत्त्वपूर्ण घटक ठरले. ‘रामन इफेक्ट’ संशोधनासाठी रामन यांनी केवळ २०० रु. (फक्त रु. दोनशे)ची साधनसामुग्री वापरली होती हे विशेष! तर आज रामन परिणामाचा प्रगत अभ्यास करण्यासाठी लक्षावधी डॉलर्सची साधने वापरली जातात!! त्यांना या संशोधनासाठी १९३० साली भौतिकमध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीय नव्हते तर आशियातील पहिले व्यक्ती होते. हा शोध लावल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ १९८६ पासून देशभरात या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.
१९५४ साली भारत सरकारने रामन यांचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान केला. भारतातील १७ विद्यापीठांनी, तर जगातील ८ विद्यापीठांनी रामन यांना सन्माननीय डॉक्टरेट- फेलोशिप सन्मानपूर्वक बहाल केली. १९४३मध्ये रामन यांनी बंगलोर येथे ‘रामन संशोधन संस्थे’ची स्थापना केली. आणि सुमारे ३५० शोधनिबंध सादर केले. २१ नोव्हेंबर १९७० रोजी निधन होईपर्यंत ते संशोधनात मग्न होते.
Recover your password.
A password will be e-mailed to you.