Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Maharashtra BJP: चंद्रकांत पाटील यांच्याजागी शेलार किंवा बावनकुळे?; शहाभेटीनंतर चर्चा जोरात

4

हायलाइट्स:

  • महाराष्ट्रातील भाजपचं नेतृत्व बदलण्याच्या हालचाली.
  • चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी शेलार किंवा बावनकुळे?
  • मुंबई जिंकायची असल्याने शेलार यांचे नाव आघाडीवर.

मुंबई:भाजप आमदार अॅड. आशिष शेलार सर्वप्रथम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. पाठोपाठ राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शहा यांची भेट घेतली आणि नंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं दिल्लीत लँड होणं हा घटनाक्रम अनेक अर्थांनी महत्त्वाचा आणि तितकाच उत्सुकता वाढवणारा ठरला आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या तीन प्रमुख नेत्यांची ही स्वतंत्रपणे दिल्लीवारी नेमकी कशासाठी होती, याचा उलगडा अद्याप झालेला नसला तरी पडद्यामागे बरचं काही घडतंय, याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ( Maharashtra BJP President Latest Update )

वाचा: भाजप-मनसे युतीत ‘हा’ अडथळा; पाटील-राज भेटीवर फडणवीस बोलले…

महाराष्ट्र भाजपात सर्वकाही आलबेल आहे, असं दाखवलं जात असलं तरी प्रत्यक्षात श्रेष्ठींच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय, अशी चर्चा गेल्या काही दिवसांतील घडामोडींनंतर राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यात महाराष्ट्रात पक्षाचं नेतृत्व बदलून धक्कादायक निर्णय केंद्रीय नेतृत्व घेऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे. त्यानुसार चंद्रकांत पाटील यांना पदावरून दूर करून प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आमदार आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे. शेलार यांच्यासोबतच विदर्भातील नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचेही नाव चर्चेत असून ओबीसी चेहरा म्हणून त्यांचा विचार केला जाऊ शकतो असे सूत्रांचे म्हणणे आहे.

वाचा:आरक्षणावर फडणवीसांची नवी भूमिका; म्हणाले, ‘तो संघर्ष टाळण्यासाठी…’

चंद्रकांत पाटील यांच्यावर केंद्रीय नेतृत्व नाराज नसलं तरी येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेसह अनेक प्रमुख पालिकांच्या निवडणुका आहेत. त्यादृष्टीने रणनीतीचा भाग म्हणून नेतृत्वबदलाची खेळी खेळण्याच्या विचारात भाजप आहे. त्यात शेलार यांच्या नावाला अमित शहा यांची पहिली पसंती असल्याचे सांगण्यात येत आहे. शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पालिका निवडणुका भाजपने लढल्या होत्या. त्यात भाजपला चांगले यश मिळाले होते. शिवसेनेसाठी हे निकाल धोक्याची घंटा ठरतील असे तेव्हा बोलले गेले होते. त्याच पार्श्वभूमीवर शेलार यांच्याकडे मोठी जबाबदारी दिल्यास येत्या पालिका निवडणुकीत त्याचा पक्षाला फायदा होईल, असे गणित मांडले जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून आशिष शेलार हे राज्यभरात दौरा करत आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या विभागांत जाऊन ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. संघटनात्मक पातळीवरील हे दौरे निश्चितच कुणाच्यातरी सांगण्यावरून सुरू आहेत, हे स्पष्ट असून शेलार यांनी थेट दिल्ली गाठून अमित शहा यांची भेट घेतल्याने काहीतरी ठरतंय हे पक्कं आहे. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी मात्र इन्कार केला आहे.

फडणवीसांनी शक्यता फेटाळली

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत राज्यात नेतृत्वबदलाची शक्यता फेटाळून लावली आहे व महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यामागचं कारणही दिलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा अलीकडेच विस्तार झाला आहे. केंद्रात अनेक नवे मंत्री आले आहेत. या मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही दिल्लीत गेलो होतो. त्यामागे दुसरं कोणतंही कारण नव्हतं. राज्यामध्ये पक्षात सध्यातरी कुठलेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. प्रदेशाध्यक्ष बदलण्याची तर अजिबात चर्चा झालेली नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अतिशय चांगलं काम करत आहेत. पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. आमचे श्रेष्ठीही त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे उगाच काहीही पतंगबाजी करू नका, असे सांगत बातम्या कमी पडल्या तर माझ्याकडे मागा पण चुकीच्या बातम्या देऊ नका, असा सल्ला फडणवीस यांनी पत्रकारांना दिला.

वाचा: मुंबईत बॉम्बची दहशत पसरवणाऱ्या कॉलचं गटारी कनेक्शन!; पोलीस हैराण

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.