
Tej Police Times
वारीत धर्मिक विधी नसतो. विधीसाठी अन्य तीर्थक्षेत्रं आहेत. आनंदाच्या अभिव्यक्तीसाठी वारकऱ्यांचं भजन असतं. दिंडी म्हणजे केवळ प्रदक्षिणा नव्हे, समूहाच्या एकतेचं प्रतीक आहे. एकता किती गरजेची आहे, हे आज माणसाला कळत आहे. श्रीमंत आणि सुशिक्षित माणसं एकटी राहतात; परंतु संकट येतं तेव्हा समूह आठवतो. आनंद वाटल्यानं वाढत असतो, ही समज यायला हवी. कोणतंही कार्य समूहाला जड नसतं. ही सामूहिक एकता माऊलींनी सव्वासातशे वर्षांपूर्वी निर्माण केली. एक देवता, एक निष्ठा, एक तत्त्वज्ञान, एक नामसाधना इत्यादींचा त्यात समावेश केला. दशमी, एकादशीच्या कीर्तनात माऊली स्वत: टाळ घेऊन उभे राहत आणि नामदेव महाराज कीर्तन करीत. पंथ आणि जात दूर सारून सर्वांनी एकत्रित यावं, ही माऊलीची संकल्पना आज साकार होताना दिसत आहे. लाखो लोक पायी चालतात, हा दर वर्षी होणारा विश्वविक्रम आहे. एकत्रिकरणात सिद्धान्ताची बीजं पेरली जातात. एकत्रित राहण्याचा मंत्र दिला जातो. दर महिन्याला वारी जमत नसली, तरी भगवंतमुखातून नामदेव महाराज बोलतात,
आषाढी कर्तिकी विसरू नका मज।
सांगतसे गुज पांडुरंग।। नामदेव गाथा
तुकाराम महाराज स्वभिमानानं सांगतात ‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी। आणिक न करी तीर्थव्रत।।’ इथं ‘न लगे हिंडणे मुंडणे ते काही। साधनाची नाही आटाआटी।।’ मग वारीत नेमकं काय करायचं? ‘चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा।।’ हे सर्व ताण घेऊन करायचं नाही, तर ‘समाधान चित्ता सर्वकाळ।’ अशी वारी आणि संतसंगती अन्यत्र दुर्लभ आहे, ज्यात ‘लाऊनि मृदंग श्रुती टाळ घोष। सेवूं ब्रह्मरस आवडीने।।’ वारी प्रथम समजावी, मग ती समजून घडावी यालाच भाग्य असं म्हणावं. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे आभार मानतो; ज्यामुळं वारीचं स्वत:सह वैचारिक चिंतन घडलं. संतांचं अंतरंग जगापुढं मांडता आलं. वारकरी अंतरंगातून कसा असतो, हे सांगता आलं. ज्ञान आणि भक्तीनं रंगलेला वारकरी असतो.
Recover your password.
A password will be e-mailed to you.