Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘२२ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. प्रभू राम मंदिर उभारणीसाठी सुमारे ५००-५५० वर्षांचा संघर्ष करण्यात आला आहे. शेकडो रामभक्तांनी यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे मंदिर उभारणीचे काम झाले आहे. प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होणार, या दिवसाची तमाम रामभक्तांना प्रतीक्षा आहे. त्या दिवशी आपापल्या भागांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे, सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, खासगी आस्थापनांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
‘जयंतीच्या पूर्वसंध्येला राममंदिर ही ‘बाळासाहेबांना श्रद्धांजली’
कोट्यवधी रामभक्तांसह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे अयोध्येत राम मंदिर व्हावे, हे स्वप्न होते. बाळासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अयोध्येत २२ जानेवारी रोजी राममंदिराचे लोकार्पण होत आहे, ही बाळासाहेबांना मोठी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मध्यरात्री ठाण्यात रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात केली.
शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: रक्तदान केले. ‘परदेशी गुंतवणुकीत राज्याने कर्नाटक, गुजरातला मागे टाकून पुन्हा पहिला क्रमांक मिळवला आहे. अनेक उद्योजक आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आजही महाराष्ट्राला पहिली पसंती देत आहेत’, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटक मीनाक्षी शिंदे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार उपस्थित होते.
वारकरी बांधवांना द्यावे निमंत्रण
राजकारण्यांऐवजी साधू-संत, वारकऱ्यांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण द्यावे, अशी मागणी वारकरी साहित्य परिषेदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन नगरीतील आणि समस्त महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार बांधवांचे श्रीराम मंदिर उभारणीत महत्त्वाचे स्थान आहे. राममंदिर उभारण्यासाठी राज्यातील सर्व स्तरांतील वारकरी बांधवांनी गावोगावी भजन-कीर्तन-प्रवचनाद्वारे गावा-गावातून प्रत्येकी एक वीट व सोबत रोख निधी जमविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. यासाठी रामायण कथा आयोजित केल्या व राज्यात प्रबोधन केले. त्यामुळे साधू-संत, महंत, कीर्तनकार, प्रवचनकार यांच्यासह विचारवंत, वारकरी प्रतिनिधी यांना निमंत्रित करावे, भजन साहित्य उपलब्ध करून देऊन रेल्वेद्वारे अयोध्या प्रवासाचे आरक्षण करावे, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेने केली आहे. परिषदेचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. शांताराम दुसाने, उपजिल्हाध्यक्ष जिभाऊ सूर्यवंशी आदींच्या सह्या आहेत.