तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

अल्पभूधारक महिला शेतकऱ्याची थट्टा; वीज जोडणी न देताच दीड लाखाचे बिल

0 42

नांदेड: जिल्ह्यात महावितरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. माहूर तालुक्यातील एका महिला शेतकऱ्याच्या पंपाला कृषी वीज कनेक्शन न देताच विद्युत कंपनीने चक्क दीड लाखाचे बिल आकारले आहे. विशेष म्हणजे सदर महिला शेतकरी वीज कनेक्शनसाठी कार्यालयाचे खेटे मारत आहे. असे असताना ही कुठलीच वीज जोडणी न देता लाखो रूपयाचे बिल दिल्याने आश्चर्य आणि व्यक्त केला जात आहे.

माहूर तालुक्यातील गोकुळनगर अल्पभूधारक शेतकरी ज्योती सुभाषराव डाखोरे यांच्या नावे तीन एकर जमीन आहे. त्यांनी २०११ मध्ये त्यांच्या गट क्रमांक १३५ या शेतात विहीर बांधली. त्यानंतर वीज जोडणीसाठी फेब्रुवारी २०१३ मध्ये महावितरणकडे ६ हजार ७२० रुपये कोटेशन भरले होते. मात्र अद्याप ही अद्याप वीज जोडणी देण्यात आली नाही. वीज जोडणीसाठी वृद्ध दांम्पत्य महावितरण कार्यलयाचे खेटे मारावे लागले.

दरम्यान सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा वीज जोडणी करून मिळत नसल्याने व्यवस्थित होऊन डाखोरे यांनी सदरचे प्रकरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच नांदेडकडे दाखल केले होते. यासंदर्भात मंचाने २३ फेब्रुवारी २०१८ रोजी निकाल दिला. त्या निकालात आदेशाच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत वीज जोडणी करून द्यावी. मुदतीत वीज जोडणी करून न दिल्यास वीज कंपनी विलंबाच्या प्रती आठवड्याला शंभर रुपये अर्जदारास द्यावे, असे आदेश दिले होते. वीज जोडणीसाठी कोटेशन शुल्क भरून अकरा वर्षाचा कालावधी लोटला असताना वीज जोडणी देण्यात आली नाही. मात्र महावितरण कंपनीकडून त्यांना १ लाख ५८ हजार ६४४ रुपयाचे विद्युत बिल आकारण्यात आले आहे.

महावितरण विभागाच्या या कारभारावर डाखोरे दांम्पत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे शासन महिला सक्षमीकरणाच्या जाहिराती करत आहे. दुसरीकडे पैसे भरून सुद्धा अकरा वर्ष वीज जोडणी दिल्या जात नाहीये. महावितरणाचा भोंगळ कारभार आणि शासनाची दुटप्पी भूमिका यात शेतकरी मात्र चांगलाच भरडला जात आहे. शेतात सिंचनाची सोय असून सुद्धा वीज जोडणी मिळत नसल्याने बागायत शेती करण्यापासून शेतकरी वंचित राहत आहेत. त्याकडे ही महावितरणाने लक्ष देऊन तातडीने वीज जोडण्या देण्याची मागणी होत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.