Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बंद दाराआड जरांगे-चिवटे यांचं ३ तास गुफ्तगू, दोघेही म्हणाले, केवळ सदिच्छा भेट…!

11

जालना : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी अध्यादेश जारी न करताना केवळ अधिसूचना काढून मनोज जरांगे यांचे उपोषण आंदोलन संपविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटीतील दुसऱ्या टप्प्यातील उपोषण सोडविण्यासाठी संवाददूत म्हणून मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांची महत्त्वाची भूमिका राहिली. केवळ अधिसूचना काढून सरकारने जरांगे यांचं उपोषण मोडित काढून मराठा समाजाला नेमकं काय दिलं? अशी टीका होतेय. यादरम्यान आज मंगेश चिवटे यांनी जरांगे यांची आंतरवालीत जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास तीन ते साडे तीन तास बैठक सुरू होती. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही. दुसरीकडे ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं उभयतांकडून सांगण्यात आलं.

आंतरवली सराटी मधील आंदोलन स्थळाशेजारील एका घरात दोघांमध्ये तब्बल तीन-साडे तीन तास चर्चा झाली. जरांगे यांनी आंतरवाली सराटीतून निघताना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. मात्र मुंबईच्या वेशीवर आल्यावर त्यांनी सरसकट मागे सोडून ‘सगेसोयऱ्यांवर’ जोर दिला. परंतु ही मागणी न्यायालयात टिकण्यासारखी नाही, असे अनेक कायदेतज्ज्ञ सांगत आहेत. जरांगे यांच्या लाखोंच्या मोर्चामुळे शासनावर मोठा दबाव आला होता. पण सरकारने मराठा समाजाला ठोस काहीही न देता डावपेच आखून मराठ्यांचा मुंबईला पडलेला वेढा उठवला. जरांगेंच्या आंदोलनावर हळूहळू विविध स्तरातून मान्यवर मंडळी प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना मंगेश चिवटे यांनी जरांगे यांची घेतलेली भेट सूचक मानली जातेय.

ही केवळ सदिच्छा भेट होती. आपण त्यांना ५७ लाख नोंदी असलेल्या लोकांच्या परिवाराला प्रमाणपत्र वाटप करा, अशी विनंती केली तसेच मराठवाड्यातील कमी नोंदीबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याची प्रतिक्रिया जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली तर सदिच्छा भेटीसाठी आलो होतो. तुळजाभवानी आणि अक्कलकोट स्वामी समर्थांचा प्रसाद घेऊन पाटलांना भेटल्याची प्रतिक्रिया चिवटे यांनी माध्यमांना दिली.

सरकारकडून मनधरणीचा प्रयत्न?

मराठा आरक्षणासाठी दिलेल्या आश्वासनांची त्वरित अंमलबजावणी झाली नाही पुन्हा एकदा आमरण उपोषण करेन, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी १० फेब्रुवारीचा अल्टीमेटम दिला होता. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आणि मंगेश चिवटे यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. सरकारकडून जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

फक्त सदिच्छा भेट-मंगेश चिवटे

तुळजापूरला येताना आई तुळजाभवानी दर्शन घेतलं होतं. आई तुळजाभवानीचा प्रसाद आणि अक्कलकोट स्वामी समर्थांचा प्रसाद घेऊन आलो होतो. त्यांना प्रसाद दिला. ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Mangesh Chivte Meet Manoj Jarange | मनोज जरांगे आणि मंगेश चिवटे यांची भेट, ४ ते ५ तास बंद दाराआड चर्चा!

मुख्यमंत्र्यांनी पाठवलं नाही- जरांगे

शिंदे समितीने काम वाढवलं पाहिजे. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या आहेत. ५७ लाख नोंदी असलेल्या लोकांच्या परिवाराला प्रमाणपत्र वाटप करा. हैदराबाद गॅझेट सुद्धा घ्या. चिवटे हे देवाला गेले होते. त्यांना मुख्यमंत्र्यांनी पाठवल नसल्याची प्रतिक्रिया भेटीनंतर जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.