
Tej Police Times
भानगरमध्ये प्रचारादरम्यान राज्य सरकारमधील अर्थमंत्री कनू देसाई यांनी काही दिवसांपूर्वी कोळी समाजाविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून वातावरण तापले असून, कोळी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोळी समाजाचे नेते मुन्ना बावलिया यांनी भाजपवर टीका केली आहे. ‘आम्ही भाजपला मतदान केले. तरीही तुम्ही आमचा अपमान का केला,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कनू देसाई यांनी जाहीरपणे कोळी समाजाचा अपमान केल्याने त्यांनी जाहीर माफी मागावी. भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी. आम्ही लोकांना एकत्र करू शकत नाही. मात्र, त्यांना पराभूत करू शकतो. कारण कोळी समाजाकडे मोठी मतशक्ती आहे, अशा शब्दांत टीका केली आहे.
गुजरातमध्ये मंगळवारी, ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात एकाच वेळी २५ लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. मात्र, निवडणूक यंत्रणेसह राजकीय पक्षांसमोर सर्वांत मोठे आव्हान वाढत्या तापमानाचे आहे. राज्यात मतदानाच्या दिवशीच उष्णतेची लाट येण्याचा इशारा असून, हवामान विभागाने ‘यलो अॅलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घटण्याची भीती व्यक्त होत आहे. अहमदाबादमध्ये शनिवारी तापमान ४० अंशांवर गेले होते. अहमदाबादपाठोपाठ राजकोटमध्ये ४०.९, सुरतमध्ये आणि भावनगरमध्ये ४०.४, बडोद्यात ४१.२ तापमान होते. यात राजकीय पक्षांची कसोटी लागली होती. सर्वच पक्षांनी रविवारच्या अखेरच्या दिवशी सकाळी नऊलाच रॅली काढण्याचा निर्णय घेतला. गुजरातमध्ये गांधीनगर (३७.८) वगळता सर्वच ठिकाणी तापमान ४० अंशांच्या वर आहे. कच्छ-सौराष्ट्रातील भावनगर, पोरबंदरमध्ये मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
‘यलो ॲलर्ट’ दिल्याने दुपारचे व्यवहार ठप्प झाले आहेत. उष्णतेच्या प्रकोपामुळे अहमदाबादमध्ये ११ दिवसांत अडीच हजारांवर रुग्ण आढळले. येथील स्थानिक डॉक्टर दीपांश पटेल यांनी सांगितले, की उष्णतेशी संबंधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमालीची वाढली आहे. स्थानिक नागरिकांपेक्षा कामगारांची संख्या अधिक असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे अहमदाबादमध्ये सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये; तसेच शहरातील अनेक भागांत ‘ओआरएस कॉर्नर’ सुरू करण्यात आले आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.