Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मटा ग्राउंड रिपोर्ट: कानपूरमध्ये ‘उमेदवार’ नरेंद्र मोदीच! नाराज कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचा प्रयत्न

10

ऋतुजा सावंत, कानपूर : एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजले जाणारे उत्तर प्रदेशमधील कानपूर सन २०१४मध्ये मोदी लाटेवर स्वार झाले. उद्योगांचा तरीही लखनौ, वाराणसी शहरांपुढे बुजलेला हा मतदारसंघ पुढील दहा वर्षे भाजपकडेच राहिला. मात्र, यंदाच्या निवडणुकीत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, ती येथील भाजपचे उमेदवार रमेश अवस्थी यांच्यामुळे. मूळ फरुखाबादचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून अलिप्त राहिलेल्या अवस्थींबाबत नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अखेर खुद्द मोदी यांनाच रोड शोद्वारे कार्यकर्त्यांत हुंकार भरण्याचा प्रयत्न करावा लागला. यात त्यांना काही अंशी यश आलेही; पण आजही अवस्थींना नाही, तर मोदींना मत द्यायचे, असे येथील मतदार सांगतात.

‘भाजप उमेदवाराला मत, हे मला, भाजपला मत आहे,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच कानपूरमध्ये झालेल्या प्रचारसभेत केले. त्याबरोबर भाजप कार्यकर्त्यांमध्ये काहीसा उत्साह निर्माण झाला; परंतु अजूनही भाजपसह संघाचे सदस्य प्रचाराच्या मैदानात सक्रिय उतरलेले दिसत नाहीत. एकूणच वातावरणात मरगळ आहे. दुसरीकडे समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने काँग्रेसचे उमेदवार आलोक मिश्रा यांचाही प्रचार आस्ते कदम सुरू आहे. मतदारसंघात काँग्रेस पक्षश्रेष्ठींची अद्याप एकही प्रचारसभा झालेली नाही. उद्या, १० मे रोजी ही कसर भरून निघेल; परंतु उन्हाच्या कडाक्यात प्रचाराचा ज्वर चढेल का, याबाबत साशंकताच आहे.

काही स्थानिकांशी याबाबत संवाद साधला असता, बहुतांश जणांनी मोदींच्या चेहऱ्यालाच आपले मत देणार असल्याचे सांगितले. ‘उमेदवार कोणीही असो, पंतप्रधान मोदी असले पाहिजेत आणि त्यासाठी भाजपला मत देणार,’ असे येथील स्थानिक अॅड. सत्येंद्र वाजपेयी आणि अॅड. सुशीलकुमार पांडे यांनी सांगितले. यासाठी त्यांनी राम मंदिरासह राष्ट्रीय पातळीवरील विकासकामांची यादी मांडली. कानपूरमध्ये रोडावलेल्या गुन्ह्यांचे प्रमाणही अधोरेखित केले. स्वरूपनगरचे नगरसेवक पवन गुप्ता यांनी या निवडणुकीची परिस्थिती सांगितली. ‘मोदी मतदारसंघात येत नव्हते, तर काहीसा किंतु कार्यकर्त्यांच्या मनात होता; परंतु त्यांच्या रोड शोनंतर वातावरण बदलले आहे. कानपूरच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा झाला आहे. सारे काही स्वच्छ झाले आहे. आमचा उमेदवार कमळ आहे. त्या चिन्हावर कोणीही उभे राहिले, तरी आम्ही त्याला मदतच करू,’ असे गुप्ता म्हणाले.

रिक्षाचालक विजय खन्ना कानपूर-मुंबई असा ट्रक चालवतात. ‘दहा वर्षांत कानपूरमध्ये काहीही बदललेले नाही. मुंबईचा विकास पाहिला की, कानपूरमध्ये पूर्ण हयातीत असा विकास दिसणार नाही, असे वाटते; पण तरीही मत मोदींनाच. कारण दुसरा पर्याय काय,’ असा प्रश्न ते उपस्थित करतात. तर ‘या निवडणुकीकडे मी बदल म्हणून पाहतो. बरीच वर्षे एकाच पक्षाची सत्ता आली तर हुकूमशाही येते,’ असे मत उत्तर प्रदेश अल्पसंख्याक काँग्रेस प्रदेश सचिव हाजी दिलशाद अहमद कुरेशी यांनी मांडले.

ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मण

कानपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आर्यनगर, कानपूर कँटोन्मेंट, सिसामाऊ हे तीन विधानसभा मतदारसंघ समाजवादी पक्षाकडे आहेत. गोविंदनगर व किडवईनगर हे दोन मतदारसंघ भाजपमध्ये आहेत. हे दोन मतदारसंघ ब्राह्मणबहुल आहेत. त्यांच्या मतांवर बाजी कोण मारेल, हे बरेचसे अवलंबून आहे. जवळपास २८ वर्षांनंतर येथे काँग्रेसने ब्राह्मण उमेदवार दिला आहे. भाजपचाही उमेदवार ब्राह्मण आहे. त्यामुळे ही मते विभागली जाण्याची शक्यता आहे. आलोक मिश्रा यांची भिस्त बऱ्याच अंशी समाजवादी पक्षावर आहे. कारण येथे काँग्रेसची संघटना कमकुवत आहे. पण मिश्रा यांना ब्राह्मण तसेच समाजवादी पक्षाची हक्काची मते मिळतील, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करतात.
बीआरएसला चिंता ‘आउटगोइंग’ची; दहा मतदारसंघांत भाजप, कॉंग्रेसचे उमेदवार ‘केसीआर’चे साथीदार
काय आहे सद्यस्थिती?

– कानपूरच्या संपूर्ण शहरात कुठेही बॅनर, पोस्टर लागलेले दिसत नाहीत.
– कानपूर विमानतळाच्या बाहेर पडण्याच्या मार्गावर एका मध्यम आकारच्या स्क्रीनवर मात्र भाजपच्या प्रचाराचे चित्र दिसले.
– बाहेर काही कॅमेरामन, हार, तुरे घेतलेले पाच-सहा जण होते. बघ्यांची गर्दीही होती. काहीच वेळात रोड शो करण्यासाठी अक्षरा सिंह ही भोजपुरी अभिनेत्री आली. तिला घेऊन गाड्यांचा ताफा निघाला.
– मोदी यांच्यावरील प्रेमापायी एका हातरिक्षाचालकाने स्वत:हून भाजप उमेदवाराच्या प्रचाराचे पोस्टर रिक्षाला लावून घेतले होते.

गेल्या दहा वर्षांत भाजपने काय केले?

गेल्या दहा वर्षांत येथील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. आधी १६ ते १८ तास वीज खंडित होत असे. आता बिघाड झाल्यासच तो त्रास असतो. गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, रोजगार, स्थलांतर, हे प्रश्न कायम आहेत. छोटे दुकानदारही व्यवसाय नीटसा चालत नसल्याची तक्रार करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उद्योगांची नगरी असूनही लखनऊ, वाराणसी या शहरांपेक्षा कानपूरला कायमच सापत्न वागणूक मिळते, ही खदखद येथील लोकांच्या मनात वाढू लागली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.