हायलाइट्स:
- शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया
- राजकीय चर्चा झाली नसल्याचा व्यक्त केला अंदाज
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन दिग्गज नेत्यांमधील ही भेट नेमकी कोणत्या मुद्द्यांवरून झाली, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘राज्यातील अनेक लोकं पवारसाहेबांना भेटत असतात. त्यांच्या काही समस्या मांडत असतात. ‘त्या’ समस्या राज्याच्या प्रमुखाच्या कानावर घालून काही निर्णय घ्यायचा असेल म्हणून पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असेल,’ अशी माहिती अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
बैठकीत राजकीय चर्चा नाही?
बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, या प्रश्नावरही अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. ‘या बैठकीला मला, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात यांना बोलावण्यात आलं नाही. याचा अर्थ ही राजकीय चर्चा नसावी. पक्षीय चर्चा असती तर कदाचित आम्हाला बोलावलं असतं,’ असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.
‘पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना आज पहिल्यांदाच भेटत नाहीत. ते ५० वर्ष समाजकारण, राजकारण करत असताना त्यांच्या अवतीभवती देशाचं आणि राज्याचं राजकारण फिरत असतं. राज्याच्या प्रश्नासाठी त्यांनी चारवेळा मुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आल्यावरही पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत,’ असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची नुकतीच मुंबईत मॅरेथॉन बैठक झाली आहे. या बैठकीत संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पक्षाच्या या बैठकीनंतरच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने तर्क-वितर्क लढवले जात होते.