
Tej Police Times
नवरात्रात जसा गरबा, दांडीया खेळला जातो त्याप्रमाणे महाराष्ट्रात भोंडला खेळला जातो. विदर्भात याला भुलाबाई असे म्हणतात. मुली पाटावर रांगोळीने किंवा धान्याचा वापर करुन हत्ती काढतात त्यावर फुले किंवा हार घालून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर मुली एकत्र जमून पाटाभोवती फेर धरतात आणि भोंडल्याची गाणी म्हणतात. पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन, याप्रमाणे रोज एक-एक गाणे वाढवतात आणि सोळाव्या दिवशी सोळा गाणी म्हणतात. गाणी वाढू लागली, की ती गाणी म्हणण्यासाठी वेळही वाढू लागतो. प्रत्येकीच्या घरी एवढा वेळ देणे अवघड होते. मग या मुली एकमेकिंच्या घरी जावून एकत्र जमतात आणि फेर धरून गाणी गातात.
महाराष्ट्रात जशी वळणावळणावर जशी भाषा बदलते तसे सण साजरा करण्याच्या पद्धतीत थोडा फार फरक जाणवतो. हादग्याचा सण साजरा करताना काही ठिकाणी पूजेसाठी पाच खडे घेतात. त्यांची पान-फुलांनी पूजा करतात. काही ठिकाणी हादग्याची किंवा दुसऱ्या एखाद्या झाडाची फांदी रोवून तिच्याभोवती फेर धरला जातो. वऱ्हाड-खानदेशात तर भाद्रपद पौर्णिमेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत महिनाभर हा सण साजरा करतात. तेथे शंकर, पार्वती व गणपती यांच्या मूर्तीची स्थापना करून भुलाबाईची गाणी म्हणतात. ही भूलाबाई म्हणजे पार्वती होय. भिल्लीणीचे रुप घेवून शंकराला भुलवणारी ती भुलाबाई. कैलास पर्वतावर सारीपाट खेळत असताना महादेव हरतात आणि रुसून कैलास सोडून निघून जातात. त्यांना कैलासावर परत आणण्यासाठी पार्वती माता भिल्लीणीचे रुप घेते ती ही भुलाबाई असे सांगितले जाते. कर्नाटकात भोंडला साजरा करताना पाटावर एकच हत्ती काढण्याची प्रथा असून त्याच्याभोवती भोंडल्याची नऊ गाणी म्हणण्याची पद्धत आहे.
भोंडल्याची गाणी एका खास चालीने म्हटली जातात. प्रत्येक गाण्यात सासू सून, नणंद-भावजय, सासर-माहेर अशा गोष्टी असतात. ऐलमा पैलमा गणेशदेवा । माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा , ‘एक लिंबू झेलू बाई, अक्कणमाती चिक्कण माती अशी गाणी गाऊन शेवटी ‘आड बाई अडवणी। आडाचं पाणी खरवणी.. आडात पडला शिंपला । आमचा भोंडला संपला’ हे गाणे म्हणून भोंडला संपवला जातो.
गाणी संपल्यानंतर मुलींचा आवडता कार्यक्रम म्हणजे खिरापतीचा ! खिरापतीला काय गं? असेही एक गाणे म्हणून खिरापती ओळखण्याचा कार्यक्रम सुरू होतो. जिच्या घरी भोंडला असेल, ती मुलगी खिरापत वाटते. पण ती वाटण्यापूर्वी इतर मुलींना ती ओळखायची असते. त्यातच तर खरी गंमत आहे. खिरापत ओळखताना खूप मजा येते. खिरापतीचा पदार्थ रोज वेगळा असतो. वाढत्या गाण्यांबरोबर खिरापतीही वाढतात. सोळाव्या दिवशी तर सोळा खिरापती ! मग काय, या ओळखताना मुलींची चांगलीच धांदल उडते ! त्यावेळी होणारी प्रश्नोत्तर मोठी मनोरंजक असतात.
अनेकांना हा प्रश्न पडतो की भोंडला किंवा हादगा साजरा करताना हत्तीची पूजा का करतात. हत्ती हे जसं समृद्धीचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे ते मेघांचं प्रतीक आहे. त्याला जलत्त्वाचे प्रतिनीधी मानून त्याची पूजा करतात. पाऊस पडून गेलेला असतो त्यामुळे धरणी सुजलाम सुफलाम झालेली असते. भोंडल्यामधील हत्ती म्हणजे मेघ, तर लक्ष्मी, गौरी म्हणजे धरतीचे प्रतीक असे समजून त्यांची पूजा केली जाते. तसं पाहिलं तर पाऊस पडावा म्हणून आपण पूजा करतोच त्याचप्रमाणे ही प्रतिकात्मक पूजा आहे. दरवर्षी हत्ती बुडेल एवढं पाणी बरसावं हीच त्यामागची समजूत आहे. तेव्हा तुम्हीसुद्धा भोंडला, हादगा याचा आनंद घ्या आणि आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे सुरू ठेवा.
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.