Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मराठी संस्कृती आणि मऱ्हाटी भाषा यांचे नाते पैठणनगरीशी अतिप्राचीन काळापासून आहे. अगदी इसवी सन पूर्व ६ व्या शतका पासून ते थेट १९ व्या शतकापर्यंत या पुरातन नगरीचे योगदान महाराष्ट्र, देश व अंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणारे आहे. स्थानिक मराठी साहित्य व ऐतिहासिक घडामोडी यांच्या नोंदी तत्कालीन पाश्चात्य प्रवाश्यांनी लिखाणात नमूद केलेल्या आहेत. यात टॉलेमी, प्लिनी व एरीयन या विदेशी लेखकांचा समावेश आहे. भारतातील मुख्य व्यापारी पेठ, वास्तुशास्त्र, कला, साहित्य, शिक्षण व राजकीयदृष्ट्या वर्षानूवर्षे केंद्रस्थानी राहिलेल्या व मराठी साम्राज्याची राजधानी असलेल्या पैठणनगरीला भौगोलिक, धार्मिक, ऐतिहासिक व सत्तासंघर्षाची मोठी पार्श्वभूमी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैठणच्या सातवाहन या मराठी राजघराण्याने इ.स. पुर्व २३० ते इ.स. २३० असे तब्बल ४६० वर्षे दक्षिण हिंदुस्थानवर राज्य केले. त्यांच्या राजधानीचे ठिकाण तत्कालीन प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण होते. या घराण्याने एकुण ३० सम्राट दिले. यापैकी पराक्रमी सम्राट शालिवाहन यांनी सुरू केलेली “शालिवाहन शके” हिंदू कालगणना जगभर मान्यताप्राप्त आहे.
सातवाहन कुळातील सम्राट हाल यांनी “गाहासत्तसई” अर्थात गाथासप्तशती या पहिल्या मराठी ग्रंथाची निर्मिती केली. मराठी भाषेच्या अभिजात दर्जा प्राप्तीच्या अहवालात पैठणचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच मराठी अद्यग्रंथाचा संदर्भ त्यासाठी महत्वाचा ठरला आहे. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या “अभिजात मराठी भाषा समिती”ने सातवाहन राजा हाल यांनी पहिल्या शतकात संपादित केलेल्या गाथा सातसई (गाथा सप्तशती) चा मराठीतील आद्य ग्रंथ म्हणुन उल्लेख केला आहे. अभिजात भाषेसाठी ती भाषा किमान २ हजार वर्षे जुनी असावी. किंवा त्या काळापासून वापरात असावी. हा महत्वाचा निकष होता. त्यासाठी गाथा सप्तशती या सातवाहन काळातील सम्राट हाल याने संपादित केलेल्या गाथा सप्तशती या ग्रंथास प्रमाण मानले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. मराठी भाषा प्राचीन आहे. यासाठीचा पुरावा म्हणुन गाथा सप्तशतीतील संकलीत कवितांचा पुरावा या अहवालात दिला आहे. सुरवात गाथा सतसई या सातवाहन राजा हल यांनी संपादित केलेल्या ग्रंथाने झाली.
शके १२१५ मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज (जन्म आपेगाव ता. पैठण) व लीळाचरीत्र काळात मराठीचे विकसित रुप बघावयास मिळते. तर “,एकनाथी भागवत” या ग्रंथामध्येही मराठीची महती नमूद करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या “ज्ञानेश्वरी” या मराठी ग्रंथाची शुध्दप्रत (संपादन) संत एकनाथ महाराज यांनी केली. त्या अर्थाने संत एकनाथ महाराज हे आद्य संपादक आहेत. पैठणच्या अनेक महत्वाच्या संपादक आणि लेखकांनी मराठी भाषा समृद्ध केलेली आहे. राजा हल याने संकलित आणि संपादित केलेलं साहित्य (गाथा सप्तशती), संत ज्ञानेश्वरादी भावंडे, महानुभाव संप्रदायाचे साहित्य ग्रंथ, संत एकनाथ महाराज, संत गावबा, संत कृष्ण दयार्णव यांचे साहित्य असे अनेक संदर्भ प्राचीन संदर्भ साहित्य आणि भाषेच्या अनुषंगाने पैठण मधे असल्याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गाथा सप्तशती आदी ग्रंथांस मराठी साहित्यात खुप महत्व आहे.
१५३३ साली जन्म झालेल्या संत एकनाथ महाराज यांनी संपूर्ण लिखाण मराठी प्राकृत भाषेत केलेले आहे. चतुःश्लोकी भागवत या ग्रंथाचे लिखाण त्यांनी काशी क्षेत्री पुर्ण केले. तथापि संस्कृतचा अट्टाहास करणाऱ्या धर्ममार्तंडांनी विरोध केला. नंतर मराठी भाषा, त्याचे महत्त्व नाथांनी पटवून दिले. भागवताच्या ११ व्या स्कंदावर टिका करणाऱ्या “एकनाथी भागवत” या अलौकिक मराठी ग्रंथाची त्यावेळी काशीकरांनी चक्क हत्तीवरून मिरवणूक काढली होती. विशेष म्हणजे “रुख्मिणी स्वयंवर” हा अजरामर मराठी ग्रंथही त्यांनी काशी येथेच पुर्णत्वास नेला. तेथील वास्तव्यात नाथांचा संत तुळशीदास यांच्याशी संपर्क झाला. दोन्ही संतांमध्ये रामभक्तीवर प्रदीर्घ चर्चा झाली. याच प्रभावातून एकनाथांना परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्याची प्रेरणा मिळाली. आणि त्यांनी बये “दार ऊघड ! बये दार ऊघड !!” असे साकडे महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी मातेला घातले. अन् शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
पैठणच्या संतांनी मराठी शिक्षण केंद्रे म्हणून देशभरात केली मठांची उभारणी !
पैठण शहरात मध्ययुगीन काळात अनेक संतांनी ज्ञानदानाच्या हेतूने भव्य दिव्य मठांची उभारणी केली. मराठी संतांनी मराठी भाषेची शिक्षण केंद्रे म्हणून उभारलेल्या या मठांच्या शाखा देशभरातील तीर्थक्षेत्रांमध्ये आजही पाहायला मिळतात. आजमितीस पैठणला २१ महाकाय मठ कार्यरत असून बहुतांश मतांचे निवासस्थानात रुपांतर झालेले आहे. तर काही मठांची दुरावस्था झाली आहे.
संत एकनाथ महाराज यांचे शिष्य असलेल्या कृष्ण दयार्णव महाराज यांचा पैठणच्या गोदावरी नदीच्या काठावर असलेला मठ प्रसिद्ध आहे. या मठाच्या शाखा मथूरा, तिरुपती, द्वारका, तुंगभद्रा, म्हैसूर, कांची, केदारनाथ व बद्रिनाथ येथे आहेत. प्राकृत भाषा मराठीची शिक्षण केंद्रे म्हणून या मतांचे बांधकाम केले गेले होते. आचार्य आणि विद्यार्थी यांची निवासस्थाने तसेच भोजन व्यवस्थेचे स्वतंत्र दालन होते. ज्ञानदानासाठी केली जाणारी व्याख्याने व चर्चासत्रे यासाठीची बांधकामे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या मठांना ४०० वर्षांपेक्षा जास्त काळाची परंपरा आहे. कालांतराने १८ व्या शतकानंतर या मठांचा वापर यात्रेकरूंना थांबण्यासाठी होऊ लागला.
येथील शिवदिन केसरी महाराज यांच्या मठाची निर्मिती १७६१ साली करण्यात आली. विशेष म्हणजे तत्कालीन मराठा शासकांवर संत शिवदिन केसरी यांचा प्रचंड प्रभाव होता. त्यामुळे शिवदिन केसरी महाराज यांच्या पैठण येथील मठाच्या शाखा आजही नागपूर, बडोदा, देवास, ईंदोर, धार व ग्वाल्हेर येथे आहेत. बाहेरील दगडी सीलकोट व आतील लाकडी कोरीव काम ही शिवदिन केसरी मठांची खासीयत म्हणावी लागेल.
लेखकः बद्रीनाथ खंडागळे, पैठण
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.