Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ख्रिस्ती साहित्य संमेलन – एक वेगळा प्रवाह – महासंवाद

11

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर मराठीतील विविध प्रवाहांची चर्चा होणे स्वभाविक आहे. मराठीच्या आजवरच्या प्रवासात अनेक जणांनी तीची जोपासना करण्याचा प्रयत्न झाला आहे. ख्रिस्ती साहित्य संमेलनाचा प्रवाहही यानिमित्ताने समजून घ्यावा लागेल..

मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन पुण्यात १८७८ साली पार पडले. महाराष्ट्राच्या समाजजीवनात वेगवेगळ्या क्षेत्रांत नव्या मुहूर्तमेढ उभारणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याकडेच मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ करण्याचाही मान जातो. यानंतरच्या काळात महाराष्ट्रात आणि इतरत्र मराठी साहित्य संमेलने होत राहिली. मुख्य प्रवाह मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून वेगळे होऊन समांतर किंवा वेगळे अस्मिता दर्शवणारी विद्रोही, ग्रामीण, दलित, मुस्लीम, नास्तिक, कोकण, मराठवाडा अशी प्रादेशिक पातळीवरची आणि विविध विचारसरणीला वाहिलेली अनेक साहित्य संमेलने आजकाल होत असतात.

मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळे होऊन पहिल्यांदा वेगळी चूल मांडण्याचे धाडस ख्रिस्ती साहित्य संमेलन या वेगळ्या प्रवाहाने शंभर वर्षांपूर्वीच केले होते हे मात्र अनेकांना माहितही नसेल.

पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन १८ आणि १९ एप्रिल १९२७ रोजी नाशिकमध्ये शरणपुरातल्या चर्च मिशनरी सोसायटीच्या मराठी शाळेत येथे पार पडले आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते रेव्हरंड निकल मॅक्लिकल. या ‘महाराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांच्या पहिल्या साहित्य संमेलनाला सात ख्रिस्ती पंथांच्या पन्नास प्रतिनिधींसह दिडशे लोक हजार होते.

मराठी साहित्य संमेलनातून याप्रमाणे अनेक नावे प्रवाह वेगळे झालेले असले तरी त्यापैकी अनेक काळाच्या ओघात नंतर लुप्त झाले आहेत वा केवळ अस्तित्व राखून आहेत. शतकापूर्वी वेगळी वाट चोखणारा ख्रिस्ती संमेलनाचा प्रवाह मध्यंतरीच्या काही दशकांचा अपवाद वगळता आजही वाहता आणि खळाळता राहिला आहे.

गंमत म्हणजे कालांतराने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे नामांतर झालेल्या मूळ ग्रंथकारांच्या संमेलनातून फारकत घेतलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांतूनसुद्धा मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाने १९९२ पासून स्वतंत्र चूल मांडली आहे आणि आतापर्यंत वेगळी तब्बल दहा संमेलने भरवली आहेत.

विशेष म्हणजे अखिल भारतीय साहित्त्य संमेलनांचे जसे दस्तऐवजीकरण झाले आहे तसेच या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे आणि हो, मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांचेसुद्धा दस्तऐवजीकरण झाले आहे. या दोन्ही प्रवाहांच्या संमेलनाध्यक्षांची भाषणे संकलीत करण्याचे आणि त्यावर समीक्षणात्मक टीकाटिपण्णी करण्याचे महत्त्वाचे योगदान सुनिल श्यामसुंदर आढाव यांनी केले आहे.

‘धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा! शतकातील ख्रिस्त संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ ‘ या शिर्षकाचा चारशेदहा पानांचा जाडजूड ग्रंथ (दिलीपराज प्रकाशन, पुणे) आढाव यांनी पुढील पिढ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करून दिला आहे. .या ग्रंथाचे विशेष महत्त्व म्हणजे संमेलनाध्यक्षांच्या भाषणांबरोबरच ग्रंथकाराने ‘समीक्षकाच्या दृष्टिकोनांतून’ या शिर्षकाच्या लेखातून प्रत्त्येक संमेलनांची पूर्वपीठिका आणि त्यात्या संमेलनाध्यक्षांनी मांडलेल्या विचारांची समीक्षा केली आहे. मराठी साहित्यातील ख्रिस्ती साहित्याचे आणि साहित्यिकांचे स्थान, ख्रिस्ती साहित्याची व्याख्या, या साहित्याचा साहित्यिक आणि वैचारीक दर्जा, संमेलनाध्यक्षांचे उपस्थित केलेले मुद्दे, या शतकभरात मराठी ख्रिस्ती साहित्यजगात उमटलेली वादळे, वगैरे विविध विषयांचा आढाव यांनी या ग्रंथात उहापोह केला आहे. त्यादृष्टीने हा ग्रंथ केवळ मराठी साहित्यक्षेत्रासाठीच नव्हे तर एकूण मराठी साहित्यक्षेत्रासाठी .एक मौलिक ऐवज ठरतो.

.१९२७ नंतर चार संमेलने सलग झाल्यानंतर १९३३ नंतर पुढचे ख्रिस्ती साहित्य संमेलन भरायला १९७२ साल उजाडावे लागले. त्यानंतर मात्र, कॅथलिक आणि प्रोटेस्टंटपंथीय साहित्यिकांनी अगदी चंग बांधून वेळोवेळी ही संमेलने भरवली आहेत. विविध कारणांमुळे या संमेलनांच्या क्रमसंख्यांविषयी मात्र स्पष्टता नाही हे आढाव यांनी आपल्या ग्रंथात स्पष्ट केले आहे. काही संमेलनांविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.

गेल्या शतकभरात एकूण ३६ मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली असून त्यात २६ मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने आणि १० मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांचा समावेश होतो.

मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांच्या निवडीबाबत १९७२ पासून एक अलिखित संकेत पाळला जातो, तो म्हणजे एकदा कॅथलिक आणि त्यानंतर प्रोटेस्टंट असे साहित्यिक या पदासाठी आलटून पालटून निवडले जातात. गेल्या काही दशकांच्या या पायंड्याकडे पाहू जाता कॅथलिक म्हणजे वसईकडचा साहित्यिक आणि प्रोटेस्टंट म्हणजे वसई उर्वरीत महाराष्ट्रातील प्रोटेस्टंट संमेलनाध्यक्ष बनलेले आहेत. वसईबाहेरच्या महाराष्ट्रातील एकही कॅथलिक आतापर्यंत मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष झालेला नाही.

आतापर्यंतच्या इतर मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. दुसरे – मनोहर कृष्ण उजगरे ((मुंबई १९३०), तिसरे – देवदत्त नारायण टिळक (निपाणी १९३२) चौथे – लक्ष्मीबाई टिळक (नागपूर १९३३), पाचवे आणि सहावे- सत्यवान नामदेव सूर्यवंशी (मुंबई आणि पुणे- १९७२), सातवे – फादर डॉमनिक आब्रिओ (नंतर औरंगाबाद धर्मप्रांताचे पहिले बिशप- मुंबई १९७३) , दहावे – भास्करराव जाधव (बारामती १९७५), ,अकरावे – रॉक कार्व्हालो (सोलापूर १९७७), बारावे – रामकुंवर सूर्यवंशी (अहमदनगर १९८१) , तेरावे – फादर एलायस बी रॉड्रिग्स (मुंबई १९८४), चौदावे- जयंतकुमार त्रिभुवन, (कोल्हापूर १९८६), पंधरावे – विजया पुणेकर (मुंबई १९९०), सोळावे – फादर फ्रान्सिस दिब्रिटो (पुणे १९९२), – सतरावे – निरंजन उजगरे (मालवण १९९४), अठरावे -सुधीर देवीप्रसाद शर्मा (नागपूर १९९८), एकोणिसावे – -सिसिलिया कार्व्हालो (नाशिक २०००), विसावे – देवदत्त हुसळे (अहमदनगर २००१), एकविसावे -अनुपमा उजगरे (मुंबई २००५) , बाविसावे सुभाष पाटील (जालना २००७ ), तेविसावे – फादर मायकल जी. (वसई २००९), चोविसावे -अशोक आंग्रे (अहमदनगर, २०११ ), आणि पंचविसावे- नाझरेथ मिस्किटा (सोलापूर २०१४ ). आणि सव्वीसावे पौलस वाघमारे (बीड २०२२).

दलित मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने – पहिले – अरविंद पी. निर्मळ (अहमदनगर -१९९२), दुसरे – सत्यवान नामदेव सूर्यवंशी (जालना १९९३), तिसरे – अरविंद पी निर्मळ (लोणावळा १९९४), चौथे – देवदत्त हुसळे (अहमदनगर- १९९५), पाचवे – बिशप प्रदीप कांबळे (पुणे २००१), सहावे – सुभाष चांदोरीकर (संगमनेर २००४), सातवे – डॉ. गिल्बर्ट लोंढे (नागपूर २००६), आठवे – वसंतराव म्हस्के (उदगीर २००८), नववे – अनुपमा डोंगरे-जोशी (श्रीरामपूर २०११) आणि दहावे – फादर ज्यो गायकवाड (श्रीरामपूर २०१८),

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आणि मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने यांच्यात तुलनात्मकरित्या पाहिल्यास काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. मराठी साहित्यात महिलांचे योगदान फार पूर्वीपासून आहे, आठ शतकांपूर्वी होऊन गेलेल्या संत मुक्ताबाईंपासून ही स्त्रीसाहित्याची परंपरा आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी सुरु झालेल्या आणि आता शंभरीच्या जवळ आलेल्या मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष होण्याचा मान मात्र एका हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्याच स्त्रियांना मिळाला आहे. कुसुमावती देशपांडे (ग्वाल्हेर), दुर्गा भागवत (कऱ्हाड), शांता शेळके (आळंदी ) विजया राजाध्यक्ष (इंदूर) आणि अरुणा ढेरे (यवतमाळ २०१९)  आणि आताच्या संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर या त्या सहा महिला संमेलनाध्यक्ष.

याउलट केवळ पस्तीस संख्येच्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या मात्र आतापर्यंत सहा महिला संमेलनाध्यक्षा झालेल्या आहेत, यापैकी पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष होत्या आणि एक दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष होत्या.

आतापर्यंत होऊन गेलेल्या पंचवीस मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांबाबतीत आणखी दुसरे वैशिष्ठ्य म्हणजे यापैकी अनेक जण एकाच घरातील वा कुटुंबातले आहेत. लक्ष्मीबाई टिळक आणि त्यांचा मुलगा देवदत्त टिळक असे मायलेक, सत्यवान नामदेव सूर्यवंशी आणि त्यांच्या बहिण रुपकुंवर सूर्यवंशी असे भाऊबहिण, मनोहर कृष्ण उजगरे आणि त्यांच्याच घराण्यातले निरंजन उजगरे आणि अनुपमा उजगरे हे दाम्पत्य अशा व्यक्ती संमेलनाध्यक्ष झालेल्या आहेत.

मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन या दोन्ही प्रवाहांतील संमेलनाध्यक्षपद अनेक धर्मगुरुंनी भुषवले आहे, यात कॅथलिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, बिशप डॉमनिक आब्रिओ यांच्यासह प्रोटेस्टंट रेव्हरंड निकल मॅक्लिकल, रेव्ह. अरविंद पी निर्मळ आणि बिशप प्रदीप कांबळे यांचा समावेश होतो. मराठी ख्रिस्ती साहित्यप्रवाह अजूनही ख्रिस्ती धर्म आणि धर्मगुरु यांच्या प्रभावाखाली आहे हेच यातून दिसून येते.

वादविवाद, आरोप प्रत्यारोप नाही तर मराठी साहित्य संमेलन नाही. ख्रिस्ती साहित्य संमेलनेही यापासून लांब राहिलेली नाही, ”ख्रिस्ती साहित्य” या शब्दाची व्याख्या, दलित ख्रिस्ती हा अमंगळ शब्दप्रयोग अशा अनेक वादांनी ही संमेलनेही गाजलेली आहेत.

मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांत मराठी साहित्यक्षेत्रातील अनेक दिग्गज्जांनी हजेरी मांडली आहे, पुण्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाध्यक्ष असलेल्या संमेलनावेळी शांता शेळके उदघाटक होत्या, समाजवादी विचारवंत ग. प्र. प्रधान उपस्थित होते. मुंबईच्या विजया पुणेकर संमेलनाध्यक्ष असताना कविवर्य नारायण सुर्वे प्रमुख पाहुणे होते. नागपूरच्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात वामन निंबाळकर हे एक व्याख्याते होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन यांच्यांमध्ये जसे विळ्या-भोपळ्याचे सख्य किंवा छत्तीसचा आकडा आहे, अगदी तशीच स्थिती (मुख्य प्रवाहातले !) मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन यांच्यात आहे. अनेक मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांत ‘दलित ख्रिस्ती’ या शब्दावर आणि वेगळ्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांवर तोंडसुख घेतले आहे.

मराठी दलित ख्रिस्ती चळवळीचे प्रणेते अरविंद पी. निर्मळ यांनी १९९२ अहमदनगरमध्ये पहिले मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवले त्यावेळी प्रचंड विरोधामुळे ऐनवेळी संमेलनाच्या जागा बदलण्याची नामुष्की त्यांच्यावर आली होती. परिस्थितीत आज २०२२ मध्येही यात फार बदल झालेला नाही. आजसुद्धा ‘दलित ख्रिस्ती’ हा शब्द गावकुसाबाहेरच आहे.

ज्यांचे पोट भरले आहे अशांची प्रवृत्ती ख्रिस्ती दलितत्वाचे वास्तव सरळसरळ नाकारण्याची असते. याउलट आपल्या दलितत्वाचे वास्तव नाकारले तर ख्रिस्ती असल्याने इतर दलितांना दिल्या जाणाऱ्या सर्व आरक्षणादी सोयीसुविधांवर पाणी सोडावे लागते म्हणून या दलितत्वावर हक्क सांगितलं जातो. पूर्वास्पृश्य असलेल्या सर्व हिंदू. शीख आणि बुद्ध समाजाला लागू असलेल्या सोयीसुविधा आणि आरक्षण पूर्वास्पृश्य असलेल्या ख्रिस्ती समाजालाही द्याव्यात आणि त्यासाठी इतरांसारखे त्यांचेही दलितत्व मान्य करावेच लागेल. असा हा तिढा आहे.

आतापर्यंत दोनच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांना मी आवर्जून हजर राहिलो आहे, मालवणचे १९९४ चे संमेलन आणि २०११ चे तत्कालिन अहमदनगर व सध्याचे अहिल्यानगर संमेलन. मालवणच्या १९९४च्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाआधीच संजय सोनवणी यांनी ‘उत्तुंग’ हा माझा व्यक्तिचित्रसंग्रह प्रकाशित केला होता, मी मात्र संमेलनात प्रेक्षक म्हणून हजर होतो.

मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष हे पद भूषवलेल्या व्यक्तींच्या नावावर एकही पुस्तक नाही वा संमेलनाध्यक्षपदावर निवड होईपर्यंत नव्हते असे अनेकदा झाले आहे. तर जोसेफ तुस्कानो आणि अनिल दहिवाडकर अशी मोलाची साहित्यिक सेवा करणारी माणसे संमेलनाध्यक्षपदापासून लांब राहिली आहेत.

मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या नागपूर, उदगीर आणि श्रीरामपूर येथल्या अनेक मांडवात आणि व्यासपीठांवर मात्र मी अगदी हौसेने मिरवलो आहे.

  • कामिल पारखे, ज्येष्ठ पत्रकार तथा मराठी ख्रिस्ती साहित्याचे अभ्यासक, 9922419274

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.