
Tej Police Times
व्यापक ज्ञानानुभूती हे संतांचं लक्षण आहे. शब्दांतून ती प्रकट होत असते, जी सामान्यांना समजत नाही. अनुभूती समजत नसली, तरी संत सामान्यांची मानसिकता आपल्या अभंगांतून अभिव्यक्त करीत असतात. ‘असो नसो भाव आलो तुझीया ठाया। कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरी राया।।’ हे बोलणं म्हणजे सामान्यांची अभिव्यक्ती आहे. आणखी एक चरण पाहा, जणू आपलं अंत:करणच आपल्याला प्रश्न विचारत आहे, ‘काय जन्मा येऊनिया केली म्या जोडी। ऐसे घडोघडी चित्ता येते आठवू।।’ जन्माला येऊन मी काय मिळवलं? इतकं आयुष्य खर्ची घातलं, त्यात निष्पन्न काय झालं? अकारण आयुष्य गेलं, हेच सतत आठवतं. भावनात्मक हृदयाची ही अभिव्यक्ती आहे. भगवंताच्या समोर संत आपल्यासाठी अभिव्यक्त होत असतात. मन मोकळं होण्यासाठी हे गरजेचं आहे. घरातील माणसं आपल्याजवळ मन मोकळं करतात. आपण कुठं करावं? पुरुष आहोत, सहज अभिव्यक्त झालं, तर अपमान वाटतो. जखमेनं हृदय भळभळत असतं. सभ्यतेसह अहंकार अभिव्यक्तीला आडवा येतो. भावनिक हृदयाची सभ्य माणसं आतल्या आत गुदमरतात. स्वत:च्या मनाशी बोलतात; पण त्यांना अभिव्यक्त होता येत नाही. भक्ती संप्रदायात आपल्या भावना प्रवाहित करता येतात. संत आपलं मोठेपण सोडून ऐकून घेतात. माऊलीच्या वाणीतील भाव पाहा :
जे हिताहित देखती। हानिकणवा घेपती।
पुसोनि शीण हरिती। देती सुख।। ज्ञा. १३-१०४४
आलेल्या भविकांचं हित पाहतात. समोरच्याचं अहित जाणतात. हानी झाल्यानं हृदय करुणेनं भरून येतं. ‘पुसोनि शीण हरिती’ हे प्रापंचिकासाठी जास्त महत्त्वाचं आहे. शीण देणारे आणि वाढवणारेच जास्त भेटतात. मालिका आणि बातम्या ताणच वाढवत असतात. कायम ताण कसा राहील यासाठीच काहींचा जन्म असतो. माऊली म्हणतात, संत केवळ शीण हरण करतात असं नाही, तर ‘देती सुख’, म्हणजे सुख देणारे असतात. यांना संत म्हणतात. यांचे अभंग ऐकल्यावर ताण कमी होतो. स्वत: अभिव्यक्त झाल्यासारखं वाटतं. वारीसाठी दिंडीत चालत असताना हा अनुभव यायला हवा. संत आपल्याला अभंगांतून जीवनाची जाण आणि आयुष्याचं भान देत असतात. दिलेलं ग्रहण करता आलं पहिजे. ग्रहण केलेलं पचलं पहिजे. पचनासाठी काही कालावधी लागतो. तो कालावधी म्हणजे, वारीसाठी दिंडीत चालणं होय.
Recover your password.
A password will be e-mailed to you.