Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबई विद्यापीठात जागतिक पाणथळभूमी दिनानिमित्त राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

11

University Of Mumbai News : जागतिक पाणथळभूमी दिनानिमित्त दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी पाणथळभूमी या संकल्पनेवर मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण दक्षता मंडळ, एनव्हीरो-व्हिजिल आणि असोसिएशन ऑफ टीचर्स इन बायोलॉजिकल सायन्सेस (ATBS) आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन विद्यानगरी संकुलातील अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान विभागात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेदरम्यान करण्यात आले आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पाणथळभूमीचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज ओळखून यावर्षी युनायटेड नेशन्स ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेने “पाणथळभूमी पुनरुज्जीवन: पाणथळभूमी आणि मानवी कल्याण” ही संकल्पना ठरवली आहे. ह्या परिषदेच्या निमित्ताने पाणथळभूमी या अतिशय महत्वाच्या पर्यावरणीय घटकाचे महत्व, त्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन ह्या कंगोऱ्यांवर विविध तज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी यांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यांचे प्रबोधन करून त्यांना कार्यप्रवृत्त करणे या उद्देश्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थांपासून ते पीएचडी संशोधकांपर्यंत, आणि सामान्य जनतेपासून संशोधकांपर्यंत पाणथळभूमी आणि त्याचे पर्यावरणीय महत्व पोहोचविण्याच्या उद्दिष्टातून मागील २४ वर्षांपासून पर्यावरण दक्षता मंडळामार्फत हा उपक्रम राबवला जातो.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होत असलेल्या या परिषदेसाठी अनेक तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. डॉ. रितेशकुमार (संचालक, पाणथळभूमी आंतरराष्ट्रीय दक्षिण आशिया), डॉ. अजय देशपांडे (तज्ञ सदस्य, राष्ट्रीय हरित लवाद), प्रा. वरदराज बापट, (आय. आय. टी. बॉम्बे), डॉ. माल्बिका रॉय, (वुमन्स कॉलेज, कोलकाता), प्रा. भूषण भोईर, डॉ. सोनिया सुकुमारन, (राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था), आणि डॉ. पायल देसाई असे दिग्गज ह्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

मुंबई विद्यापीठाने पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने अनेक पाऊले उचलेली आहेत.ज्यामध्ये कार्बन न्युट्रल ग्रीन कॅम्पस, मियावाकी वने, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, इत्यादींचा समावेश आहे. विद्यापीठाच्या विविध विभागांच्या मार्फतही पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात अनेक परिषदा, चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. पाणथळभूमी वरील परिषदेसाठी घेतलेला पुढाकार हा विद्यापीठाच्या पर्यावरण संवर्धनाप्रती असलेल्या बांधिलकीचाच एक भाग आहे.

विविध स्पर्धांचे आयोजन :

शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी निबंध स्पर्धा आणि लघुपट/माहितीपट निर्मिती (Short Film/Documentary) या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्यासाठी खालील विषय देण्यात आलेले आहेत.

1. My visit to creek or lake/ मी पाहिलेली खाडी/ तलाव,

2. If there are no saltpans/ मिठागर नसते तर

3. Stakeholders of Wetlands/ पाणथळभूमितील भागधारक

4. Wetlands: Birds/ पाणथळभूमी: पक्षी

5. Wetlands Conservation/ पाणथळ भूमी: संवर्धन

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी

१) लेख आणि पॉवरपॉइंट सादरीकरण (Review Article and PowerPoint Presentation), २) पोस्टर प्रेझेंटेशन (Poster Presentation), ३) लघुपट/माहितीपट (Short Film/Documentary) अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांचे विषय पुढीलप्रमाणे १. पाणथळी: आर्थिक हितासाठी, २. पाणथळी: सामाजिक व सांस्कृतिक हितासाठी, ३. पाणथळी: जीवावरणाच्या हितासाठी, ४. पाणथळी: ऋतुमानाच्या हितासाठी, ५. पाणथळी: जैववैविध्याचा ऱ्हास रोखण्यासाठी.

शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नसून त्यांनी फक्त स्पर्धेकरिता नोंदणी करणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी १०० रुपये नाममात्र नोंदणी शुल्क आहे. ह्या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी (८८७९७३२१०९, ९०८२६०८७६८) या क्रमांकावर संपर्क साधून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या परिषदेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.