Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांच्यात लढत होत आहे. लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटातून पुन्हा पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. पवार आणि विखे यांच्यात जुनाच राजकीय संघर्ष आहे. या निवडणुकीत त्याला पुन्हा एकदा उजाळा मिळत आहे. पवार यांनी या मतदारसंघात व्यक्तीश: लक्ष घातले आहे. आतार्यंत ते तीन वेळा मतदारसंघात येऊन गेले. आणखी तीन सभा होणार असल्याचे सांगण्यात येते. सभेत बोलताना राष्ट्रीय मुद्यांसोबतच पवार विखे पाटील यांच्यावर टीका करतात. राहुरीच्या सभेतही त्यांनी विखे पाटील यांच्या परिवारावर टीका केली होती.
त्यावरून आता डॉ. विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील एका मेळाव्यात बोलताना पवार यांना उत्तर दिले आहे. डॉ. विखे पाटील म्हणाले, या निवडणुकीत निम्मे काम जेष्ठ नेत्यांनी करून टाकले आहे. आता उरलेले निम्मे काम १३ मे रोजी मतदार संघातील जनता करेल. शरद पवारांच्या पक्षाला उमेदवार आयात करावा लागला. हा उमेदवार कसा आहे? हे पारनेरच्या जनतेला चांगले माहिती आहे. मात्र, पारनेरच्या जनतेला २०१९ मध्ये केलेली चूक सुधारण्याची संधी आहे. मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामांचा लेखाजोगा मतदारांपुढे आहे. जे केले तेच आपण सांगतो. या मतदारसंघातील युवकांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याची माझी जबाबदारी आहे. लोकसभेची ही निवडणूक देशाचे उज्वल भवितव्य घडवणारी आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान होतील आणि नगरचा खासदारही महायुतीचाच असेल, असेही डॉ. विखे पाटील म्हणाले.
भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, माजी नगराध्यक्ष विजय औटी, काशिनाथ दाते, प्रा. विश्वनाथ कोरडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर यांनीही आपली मते मांडत लंके यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.