
Tej Police Times
महालक्ष्मीच्या प्रतिमा, चित्र आणि मूर्ती तुम्ही पाहिल्या असतील तर प्रामुख्याने आपल्याला काय दिसते, कमळाच्या फुलावर विराजमान झालेली लक्ष्मीमाता. यामागे धार्मिक कारण तर आहे. महालक्ष्मी धनाची देवी आहे. धनासंबंधित सांगितले जाते की, याचा नाश सर्वाधिक दुष्प्रभाव देणारा आहे. धन मोह-मायेमध्ये टाकणारा घटक आहे आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीवर धन शिरजोर होते, तेव्हा तो व्यक्ती वाईट मार्गाचा अवलंब करू शकतो. धनाच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या व्यक्तीचे पतन निश्चित आहे. दुसरीकडे कमळाचे फुल आपली सुंदरता, निर्मळता आणि गुणांसाठी ओळखले जाते. कमळाचे फुल चिखलात उगवते परंतु कमळाला चिखलाची दुर्गंधी कधीच येत नाही. कमळावर विराजमान असलेली लक्ष्मी हाच संदेश आपल्याला देते की, ती त्याच व्यक्तीवर कृपादृष्टी ठेवते, जो चिखलासारख्या वाईट समाजामध्येही कमळाप्रमाणे नि:स्पृह, निष्पाप राहतो आणि स्वतःवर वाईट गोष्टींचा प्रभाव होऊ देत नाही. ज्या व्यक्तीजवळ भरपूर धन आहे, त्याने कमळाच्या फुलाप्रमाणे अधार्मिक गोष्टींपासून दूर राहावे. कमळावर स्वतः लक्ष्मी विराजमान असल्याने तिला अंहकार स्पर्श होत नाही. अशाचप्रकारे धनवान व्यक्तीने संयमी, सत्यवचनी आणि साधे-सरळ रहावे. अशा व्यक्तीवर लक्ष्मी कायम प्रसन्न राहते. म्हणून कमळामध्ये लक्ष्मीचा निवास असतो असं सांगितलं जातं.
लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे. लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे, लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू धर्मात विष्णू आणि भागवत पुराणानुसार समुद्रमंथन कथानुसार, देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथन केले, त्यावेळी विविध रत्नांबरोबर सागरातून लक्ष्मीची उत्पत्ती झाली. जेव्हा जेव्हा भगवान विष्णू यांनी भूतलावर अवतार घेतात, त्या त्या वेळी त्याची पत्नी लक्ष्मीसुद्धा विष्णूची सहचरी होण्यासाठी भूतलावर अवतरली होती. देवी लक्ष्मी रामावतारात सीता बनली तर कृष्णावतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली. दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अवतारात पद्मावती होती. कल्की पुराणानुसार, कलियुगात कल्की विष्णूचा भविष्यात येणारा अवतार असून, त्यावेळी लक्ष्मी पद्मा अवतारात भूतलावर येणार असे सांगितले जाते. म्हणूनच जिथे विष्णूचे वास्तव्य आहे तिथे लक्ष्मीचा निवास असतो.
प्राचीन काळापासून पूजेमध्ये शंखाला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक वैदिक कार्यात शंख महत्त्वाचा मानला गेलाय. एवढंच नव्हे तर असंही मानलं जातं की, शंख ज्या ठिकाणी असतो तिथे सुख-शांती, धन वैभव याचा वास असतो. जिथे शंखनाद होतो तिथे कायमच सकारात्मक उर्जा असते. शंख हे भगवान विष्णूचं प्रमुख अस्त्र आणि शस्त्र देखील मानलं जातं. शंखाचे तसे अनेक प्रकार आहेत पण शास्त्रानुसार वामावर्ती आणि दक्षिणावर्ती शंख महत्त्वाचे मानले जातात. शंखाची उत्पत्ती समुद्र मंथनादरम्यान झाली होती असंही म्हणतात. हेच कारण आहे की देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे दोघे भाऊ-बहिण मानले जातात. शंख हा लक्ष्मीचा छोटा भाऊ समजला जातो. त्यामुळे जिथे शंख आहे तिथे लक्ष्मीचा निवास असतोच.
हस्तरेखांमध्ये वसे लक्ष्मी
आपल्या हस्तरेखांमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून रोज सकाळी उठल्यावर
कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती,
करमूले तु गोविंद: प्रभाते करदर्शनम् ।।
असं म्हटलं जातं. याचा अर्थ हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि हातात चैतन्य देण्यासाठी गोविंदाचा वास असतो. म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचे दर्शन घेत वरील मंत्र उच्चारून मग हात एकमेकांवर घासून ते चेहऱ्यावरून फिरवल्याने जी उर्जा मिळते ती दिवसभराच्या कामांच्या रगाड्यात आपल्या चेहऱ्यावर झळकत राहते असे म्हणतात. आपले जीवन आपल्या हातांवर अवलंबून असते. हात शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करतात. या हातांनी दिवसभरात अनेक कामे करायची आहेत, लिखाण करायचे आहे, सत्कार्य करायचे आहे. ही प्रेरणा, चैतन्य गोविंदाच्या स्मरणाने मिळणार आहे. त्याच्याच कृपेमुळे सरस्वती अवगत होणार आहे आणि सरस्वती प्रसन्न झाली, की लक्ष्मी समोरून येणार आहे. म्हणून प्रभाते करदर्शन महत्त्वाचे असून आपल्या हाती लक्ष्मी वसे असे म्हटले जाते.
जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी नांदते म्हणून घरात स्वच्छता ठेवावी असं म्हटलं जातं. साधा विचार करा तुम्ही तुमची खोली छान आवरून घेतली तिथे स्वच्छता केली तर तुम्हाला कसं वाटतं…खूप छान किंवा एक प्रकारची सकारात्मकता त्यात जाणवते. म्हणूनच स्वच्छता ज्या घरात आहे तिथे लक्ष्मीचा निवास असतोच. कचरा, जाळीजळमटे साफ केली की नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. ज्या वास्तूमध्ये स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता असते; त्या वास्तूमध्ये लक्ष्मी निवास करते. त्याचप्रमाणे चारित्र्यवान, कर्तृत्ववान, कर्तव्यदक्ष, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसांच्या घरात वास्तव्य करणे तिला आवडते. म्हणूनच आपले घर स्वच्छ, प्रसन्न ठेवणे, घरातील सर्व माणसे सदाचारी, उद्योगप्रिय, शांत, समाधानी, संयमी आणि चारित्र्यवान असतील तर त्या घरात लक्ष्मी दीर्घकाळ आनंदाने वास्तव्य करते.
लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि ऐश्वर्य जे प्रामाणिकपणे स्वकष्टाने मिळविलेल्या समाधानात आहे, संतुष्टतेत आहे म्हणूनच लक्ष्मीची प्रार्थना करताना म्हटले जाते.
नमस्ते सर्वदेवांना वरदासि हरे: प्रिया।
या गति: त्वत् प्रसन्नांना सा मे स्यात् तव दर्शनात्॥
‘‘सर्व देवांना वर देणाऱ्या, भगवान विष्णूला प्रिय असणाऱ्या हे देवी लक्ष्मी तुला माझा नमस्कार असो. तू प्रसन्न झाल्यावर जी गती म्हणजे जे स्थान माणसांना प्राप्त होते, ते मलासुद्धा तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो.’’
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.