Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हनुमान जन्मविषयी विविध मान्यता
रामभक्त हनुमानाच्या जन्मस्थळाविषयी नेमकी स्पष्टता नाही. संपूर्ण भारतात हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी केली जाते. तामिळनाडू आणि केरळात मार्गशीर्षात, तर ओडिसामध्ये वैशाख महिन्याचा पहिल्या दिवशी साजरी केली जाते. वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार, हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला. चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते, असे म्हटले जाते.
चिरंजीव हनुमान
एका मान्यतेनुसार, हनुमानाची भक्ती आणि समर्पण वृत्ती पाहून सीता मातेने त्याला अमरत्वाचे वरदान दिले. हा दिवस नरक चतुर्दशीच्या होय. सूर्याला गिळंकृत करण्यासाठी गेलेला हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी झाला. या घटनेमुळे वायुदेव क्रोधीत झाले. अखेर सर्व देवतांनी हनुमंताला अस्त्रे, शस्त्रे आणि चिरंजीवत्वाचे वरदान दिले, असेही म्हटले जाते. हनुमानाच्या व्रात्यपणामुळे एक ऋषिंनी हनुमानाला शक्तीच्या विस्मृतीचा शाप दिला होता. सीताशोधार्थ समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी जाम्बुवंतांनी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली. मात्र, यादरम्यान हनुमंतांनी बुद्धीची अनेक कामे केल्याचे सांगितले जाते.
ब्राह्मतेज व क्षात्रतेजाचे प्रतीक
हनुमंताच्या गळ्यातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक असून, हनुमंत हा महादेवाचा अवतार असल्याने त्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे. रामभक्ती करतांना त्याच्यात विष्णुतत्त्व आल्यामुळे त्यात स्थितीचेही सामर्थ्यही आले. हनुमानामध्ये ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्याने युद्धावेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करत असे, असे सांगितले जाते. महाभारत युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले. तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती.
बुद्धी व शक्तीचा संगम
हनुमान शक्ती, सामर्थ्यासाठी जेवढा प्रसिद्ध आहे, तेवढाच बुद्धीसाठीही तो प्रसिद्ध आहे. लहानपणी हनुमानाने गुरुकुलात जाऊन अनेक विद्या आत्मसाद केल्या. वानरांची युद्ध करण्याची विशिष्ट पद्धतीही त्याने शिकून घेतली. वेद, उपनिषदे त्याने लहानपणीच तोंडपाठ केली होती. हनुमानाला अनेक भाषा येत होत्या. म्हणूनच राम-लक्ष्मणाची खबर काढण्यासाठी सुग्रीवाने हनुमानाला पाठवले होते. तसेच सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमाला पाठवण्यात आले होते. तसेच समुद्र लांघणे, समुद्र सेतू उभारणे, राक्षसांचा नाश, लक्ष्मणासाठी संजीवनी आणणे, यातून हनुमानाच्या शक्तीची प्रचिती येते. जन्मत:च मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे, त्यातून वायूपुत्र मारुति तेजतत्त्वाला जिंकणारा होता, हे लक्षात येते.
हनुमानाविषयी अन्य महत्त्वाच्या गोष्टी
हनुमान चिरंजीवी असल्याने तो आजदेखील अस्तित्वात असल्याची मान्यता भाविकांमधे आहे. हनुमानाला लावण्यात येणारा शेंदुर अत्यंत पवित्र मानला जातो. शरीर सौष्ठव कमविण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमानाची आराधना करावी, असे मानले जाते. हनुमान स्तोत्र व हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते, असे म्हटले जाते. साडे साती सुरू असलेल्या व्यक्तींनी दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी व शनिवारी मारूतीचे दर्शन घ्यावे, असे सांगितले जाते. हनुमानाला शक्ती, स्फुर्ती आणि ऊर्जेचे प्रतिक मानण्यात आले आहे.