Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

श्री कृष्ण आणि जरासंधाचा संघर्ष आपल्याला काय सांगतो? आपण सत्य कसे स्वीकारतो?

7
संपन्न भूमीवर व्यापाराला मूल्य येते. परंतु उपाशी लोक आणि नापिक जमिनीवर हल्ल्यांना महत्त्व येते. राजपुतानाचा जो प्रदेश आहे, ज्याला मरुभूमी असे म्हणतात, तेथे आपल्याला शौर्याच्या, हल्ल्यांच्या आणि बंडखोरीच्या कथा ऐकायला मिळतात. या मरुभूमीने गंगेच्या सुपीक खोऱ्यावर नियंत्रण प्रस्थापित करू पाहाणाऱ्या सम्राटांचे नियंत्रण झिडकारले. जैन धर्मात महाभारत ज्या रूपात सांगितले जाते, त्यातील श्री कृष्ण आणि जरसंधाच्या संघर्षात आपल्याला हे ठळकपणे दिसून येते. पण प्रथम आपण अपरिचित अशा पाबूच्या महाकाव्यात वाळवंटातील हल्लेखोर आणि सुपीक नदी खोऱ्यातील सधन व्यापारी यांच्यात जो संघर्ष दिसून येतो, ते पाहू.

पाबूजीची कथा गेली हजारो वर्षं राजस्थानात सांगितली जाते. अशा प्रकारच्या कथा देशभरातील आणि विशेष करून दक्षिण भारतातील दख्खन पठारावरील पशुपालक समुदायात सांगितल्या जातात. पाबूने त्याच्या पुतणीला उंट भेट देण्याचे वचन दिलेले असते. त्यासाठी तो लंकेवर हल्ला करतो आणि रावणाचा पराभव करतो आणि या दूरच्या भूमीवर उंट घेऊन येतो. पाबूच्या या पराक्रमाने प्रभावित झालेली एक राजकन्या त्याच्याशी लग्न करायला तयार होते. पण विवाहविधी सुरू असतानाच पाबूला वार्ता मिळते की त्याच्या संरक्षणाखाली असलेल्या गाई चोरल्या आहेत. या चोरांचे नेतृत्त्व करणारा दुसरात तिसरा कोणी नाही तर पाबूच्या बहिणीचा नवराच आहे. पाबू या गाईंचे संरक्षण करण्यासाठी धावून जातो. तो गाईंना वाचवतो, पण मेव्हणाच्या कारस्थानामुळे झालेल्या झटापटीत पाबू गंभीर जखमी होतो. पाबू त्याच्या मेव्हण्याला ठार मारत नाही, कारण त्याला बहिणीला विधवा झालेले पाहायचे नसते. पाबूचा मृत्यू होतो आणि त्याच्याशी अपूर्ण विवाह झालेली त्याची बायको सती जाते. त्यानंतर पाबूचा भाचा स्वतःच्या वडिलांची हत्या करून पाबूच्या मृत्यूचा सूड घेतो. महत्त्वाकांक्षेचे रूपांतर युद्ध, मृत्यू आणि वेदना यातच होते, हे पाहिल्यानंतर पाबूचा भाचा संन्याशी बनतो.

या कथेत उंटांसाठी पाबू लंकेवर हल्ला करतो. पाबूवरील हा डाग पुसण्यासाठी त्याने हल्ला केलेल्या भूमीचा उल्लेख लंका असा केलेला आहे. हिंदू पौराणिक कथांनुसार रावण इतर पुरुषांच्या महिलांना पळवून नेणारा दुराचारी होता. त्यामुळे चोराकडून चोरी केल्याने तुम्ही नायक बनता. कर्माच्या सिद्धांतानुसार जे लूट करतात, त्यांनाही लुटीला सामोरे जावे लागते. त्यामुळे स्वतःच्या गाईंचे रक्षण करताना पाबूला मृत्यूला कवटाळावे लागते. सदाचारी पाबूचा मृत्यू होतो. बहिणीच्या पतीवर हल्ला करण्यास नकार देणारा पाबू सन्माने मृत्यू पावला आणि पूजनीय ठरला.

व्यापारामुळे युद्ध टळतात. तुम्ही देता आणि त्याबदल्यात तुम्हाला काही तरी मिळते. जर तुम्ही योग्य असाल तर वादाला फार कमी संधी असते. पण तुम्ही जेव्हा व्यापार करत नाही, तेव्हा तुम्ही फक्त साठेबाजी करता. तुम्ही जेव्हा चुकीच्या व्यापार पद्धती स्वीकारता तेव्हा युद्ध अटळ असते. आताच्या काळात उद्योजक स्वतःला व्यापारी न म्हणवता राजकारण्यांसारखे योद्धे म्हणवून घेत आहेत.. पण प्रत्यक्षात मात्र ते लुटारू बनलेले असतात. कर्मचारी, ग्राहक, बाजार यांना ते लुटतात, ते पिळवणूक करणारे बनतात. पण त्यांच्या स्वतःच्या हे प्रतिमेसाठी चांगले नसते. त्यामुळे माध्यमं आणि सल्लागार यांची नेमणूक करून स्वतःच्या युद्धाला न्यायासाठीचे युद्ध असल्याचे भासवतात. तुम्ही लूट करण्यासाठी हल्ले करत नाही, तर तुम्ही लोकांना वाचवण्यासाठी, लोकांना सभ्य बनवण्यासाठी, आणि प्राचीन काळातील चुका दुरुस्त करण्यासाठी हल्ले करत आहात, असे भासवले जाते. म्हणून इतिहास तज्ज्ञ पॅक्स रोमन, पॅक्स अरेबिका, पॅक्स मंगोलिया, पॅक्स ब्रिटानिका, पॅक्स अमेरिकाना असे उल्लेख करतात. याचा अर्थ लुटमार आणि हल्लेखोरीने सुरुवात होऊन नंतर लष्करी साम्राज्यामुळे निर्माण झालेली दीर्घकालीन शांतता आणि त्यातून उदयास आलेली समृद्धी आणि व्यापार असा होतो.

साम्राज्य उभे करणारे शांतता आणि व्यापाराचे जाळे निर्माण करतात. पण ज्यांना स्वातंत्र्य आणि स्वायत्ता हवी, त्यांचा मात्र ते तिरस्कार करतात. श्री कृष्ण आणि कंस यांच्यातील जो तणाव होता, त्याचा येथे उल्लेख करता येईल. गोपालक भटक्यांचा प्रतिक श्री कृष्ण होता. तर कंस हा मथुरेचा हुकूमशाह होता, त्याने जनपदांची व्यवस्था मोडून काढलेली असते. मगधचा राजा असलेला त्याचा सासरा जरासंधाचा त्याला पाठिंबा असतो. पावसावर नियंत्रण असलेला स्वर्गाचा राजा इंद्र याच्या माध्यमातून तो अधिकार गाजवत असतो. तर श्री कृष्ण गोवर्धन पर्वताच्या मदतीने त्याची स्वायत्तता गाजवत असतो. गोवर्धन पर्वताच्या उतारावर ते गाई चरायला नेत असतात. मथुरेची इच्छा आहे की या गोपालकांनी शरण यावे. गोपालकांना घाबरवण्यासाठी जे गुंड पाठवले गेले, ते सगळे श्री कृष्णासमोर नमले. शेवटी इंद्राच्या शक्तीचा वापर करून अतिवृष्टी केली जाते, गोपालकांचे गाव वाहून जावे, असा याचा उद्देश असतो. पण श्री कृष्ण गोवर्धन पर्वत उचलून धरतो आणि पर्वताचे रूपांतर एका प्रचंड मोठ्या छत्रीत होते, यामुळे लोक आणि त्यांच्या गाईंचे संरक्षण होते.

व्यापार पुनर्स्थापित करणे आणि संतुलन साधने असे काही न करता कंसाला कृष्णाला मारायचे असते आणि तो कृष्णाला कुस्ती खेळण्याचे आमंत्रण देतो. देवाणघेवाणीची जागा भीती, पिळवणूक आणि निष्कासनने घेतलेली असते.

उत्तर भारतात गंगेचे मैदान ते पूर्वेपर्यंतचा भाग सुपीक आणि श्रीमंत आहे. तर राजपुतानाचा प्रदेश निर्वाह शेतीवर अवलंबून असणारा कोरडा आणि भटक्या जमातींचा आहे. या वाळवंटी प्रदेशात आपल्याला अनेक ठिकाणी विरगळ दिसतात जे अशा पुरुषांना समर्पित आहेत, ज्यांनी चोरांपासून आपल्या समुदायाच्या गाईंचे संरक्षण केले होते. गावाच्या संरक्षणासाठी या पुरुषांच्या आत्म्यांना साद घातली जाते. श्री कृष्ण या नायकांतून पुढे आलेला असावा. श्री कृष्णाने कंसाला कुस्तीत ठार मारल्यानंतर जरासंधाने मथुरेवर हल्ला केला आणि मथुरा जाळली. त्यानंतर श्री कृष्णाला मरुभूमी ओलांडून किनाऱ्याच्या भागात म्हणजेच गुज्जर देशात जावे लागेल, तेथे त्याने द्वारकेला आपले घर बनवले. त्यानंतर पांडव बंधूंच्या मदतीने श्री कृष्णाने गमावलेल्या भूमीचा बदला घेतला आणि शब्दशः जरसंधाच्या शरीराचे दोन तुकडे केले. अर्थात हे रूपक असेल आणि श्री कृष्णाने राजमंडलाचा पाडाव करून जनपद पूर्ववत केले असावे.

श्री कृष्ण हा जेता असल्याने आपण त्याला न्यायाचा कैवारी म्हणतो, ज्याने लष्करी साम्राज्य उभे केलेल्या दुष्ट कंस आणि जरासंधाशी लढा दिला. पण जर का आपण कंस आणि जरासंध यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर श्री कृष्ण हा हल्लेखोर ठरू शकतो, ज्याच्या गाई आणि गोपालक अशा जमिनीवर अतिक्रमण करत होत्या ज्यातून जमिनदारांना भाडे आणि कर मिळत असे. आपण आपली आर्थिक आणि राजकीय प्रतिष्ठा कोणापासून घेतो यावर आपण कोणाचे सत्य स्वीकारणार हे अवलंबून असते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.